नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी पुन्हा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आता सरकारने दुसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण केल्याचे निमित्त साधून विविध कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. त्याचा संदर्भ घेत मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवरून प्रियांका यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
भाजप सरकार 100 दिवसांचा कार्यकाळ साजरा करणार आहे. मात्र, वाहन, वाहतूक आणि खाण उद्योग त्याकडे आपल्या ऱ्हासाचा जल्लोष म्हणून पाहतील. प्रत्येक क्षेत्रातून कारखाने बंद होण्याच्या आणि नोकऱ्या जाण्याच्या बातम्या येत आहेत, असे ट्विट प्रियांका यांनी केले आहे.
त्यामुळे अर्थव्यवस्थेची घसरण आणि मंदीचे सावट या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न कॉंग्रेस सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.