हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसमोर मांडली व्यथा
पुणे – माझ्यावरील राजकीय अन्यायाची आणि यामुळे पक्ष सोडून जात असल्याची कल्पना पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांना दिली. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आपल्याला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याची व्यथा इंदापूरचे माजी आमदार तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांकडे शनिवारी मांडली.
पुण्यात पाटील यांनी मोजक्याच पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलविले. पदाधिकाऱ्यांनी यावेळी पाटील यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांनी आता पक्षात थांबणे शक्य नसल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
यावर पुढची राजकीय दिशा ठरविण्यासाठी त्यांनी 4 सप्टेंबर रोजी इंदापुरात मेळावा बोलवला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करत कॉंग्रेसला रामराम ठोकण्याचे संकेत दिले होते. शनिवारी पुण्यात पाटील यांनी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक संजय बालगुडे यांना भांडारकर रस्त्यावरील घरी बोलविले होते.
हे त्यातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी केली. मात्र, “आपल्यावर राष्ट्रवादीकडून प्रत्येक वेळी अन्याय होत असल्याचे पक्षातील नेत्यांना सांगितले होते. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केले . तुम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून आपण अनेक वर्षे सोबत आहोत. त्यामुळे तुम्हाला याची कल्पना देण्यासाठी बोलविले,’ असे त्यांनी सांगितल्याचे काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शहराध्यक्षांच्या अनुपस्थितीची चर्चा
या भेटीवेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. या सर्व पदाधिकाऱ्यांना स्वत: पाटील यांनी निमंत्रण दिले होते. त्यामुळे बागवे यांना पाटील यांचे निमंत्रण होते, की नाही याची माहिती कोणालाही नाही. तर, पाटील यांनी निमंत्रण दिले असले, तरी बागवे का गेले नाहीत यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे तसेच कोणीही पदाधिकारी भेटले असतील, तर आपल्या माहीत नसल्याचे बागवे यांनी स्पष्ट केले.