“श्रीदेवी बंगलो’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रिया प्रकाश वारियरला भविष्यात आणखी हिंदी सिनेमे करण्याची इच्छा आहे. तिला दुसरा हिंदी सिनेमा मिळालाही आहे आणि तिने करारदेखील केला आहे. तिच्या या नवीन सिनेमाचे नाव “लव्ह हॅकर्स’ असे आहे.
हा सिनेमा सायबर क्राईमसंदर्भात आहे. यापुढेही जर चांगल्या सिनेमांच्या ऑफर आल्या तर आपण काम करायला तयारच आहोत, असेही प्रियाने सांगितले. अजूनही प्रियाला ऍक्टर म्हणून फारसे गंभीर्याने घेतले जात नाही. पण त्यासाठी खूप चांगले सिनेमे करायला पाहिजे. तरच आपली ओळख “चांगली ऍक्ट्रेस’ म्हणून निर्माण होईल, असे ती म्हणते. “श्रीदेवी बंगलो’ बाबत निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांनी या सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.
या सिनेमाचे शिर्षक आणि सिनेमात दाखवल्या गेलेल्या एका दृष्याला बोनी कपूर यांनी हरकत घेतली होती. या सिनेमात श्रीदेवी नावाच्या पात्राचा बाथटबमध्ये मृत्यू झाल्याचे दर्शवले गेले आहे. हे दृष्य आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्यावेळच्या परिस्थितीमध्ये साधर्म्य आहे, असा आक्षेप बोनी कपूर यांनी घेतला आहे. “श्रीदेवी बंगलो’मध्ये अरबाझ खानदेखील आहे आणि या वर्षाच्या अखेरीस हा रिलीज होणार आहे.