मुंबई – करोनाच्या काळातही राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होणार असल्याचे चित्र आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात येणार असल्याचे समजते. तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बदलाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून नाना पटोले दिल्लीत असल्याने अनेक तर्क-विर्तक वर्तविले जात आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडीला अजून वर्षही पूर्ण झालेले नाही. पण या बदलासाठीची अनेक सबळ कारणे कॉंग्रेसमध्ये सांगितली जात आहेत. त्यामुळे तो लवकरच होण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत. ज्या विदर्भात कॉंग्रेस भाजपला टक्कर देऊ पाहतेय, त्याच विदर्भातून ते येतात. तसेच ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व ते करतात. ते मूळचे कॉंग्रेसचे, पण 2014 ला ते भाजपच्या तिकिटावर खासदार झाले. पण भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणारे देशातले पहिले खासदार ठरले होते.
तसेच सध्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मंत्रिमंडळातही आहेत. महसूलमंत्री पद त्यांच्याकडे आहे. शिवाय कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाऊ शकते. त्यामुळे नाना पटोलेंच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते. मागच्या वेळीसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यामुळे आता ते ही ऑफर स्वीकारतात का याची उत्सुकता आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले होते की, पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. जी जबाबदारी मिळेल ती पार पाडण्याचा प्रयत्न करेन. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये कॉंग्रेस कमजोर पडत असल्याची चर्चा अधूनमधून सुरू होते. भविष्यातल्या निवडणुकांचाही विचार पक्षाला करायचा आहे. त्याच अनुषंगाने आता या बदलाची चर्चा जोरात सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक करावी लागणार असली तरी सध्याच्या एकजुटीच्या स्थितीत तीही गोष्ट अवघड नाही, असे कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या या खांदेपालटाला कधी ग्रीन सिग्नल मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.