नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की ज्या जिल्ह्यांत विकास कामांची अपेक्षा आहे त्या जिल्ह्यांनी आपल्या विकासकार्यातील अडथळे आता बहुतांशी दूर केले असून तेथे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गतीने विकास कार्य सुरू होऊ शकेल.
कोणत्याही जिल्ह्याच्या विकासासाठी तेथील स्थानिक लोकांचा प्रशासनाशी भावनिक संवाद असणे गरजेचे आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले. या विकास कामांसाठी सरकारी यंत्रणांनी आता नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या प्रयत्नांमुळे स्थानिक नागरीकांचे जीवनमान सुधारत असल्याचे पाहून त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाही समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्याने दुसऱ्या जिल्ह्यातील विकास कार्यापासून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या पुढील आव्हानांचे निराकरण करावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.