कोलकता -गोव्यात हातमिळवणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, कॉंग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा तृणमूल कॉंग्रेसने शुक्रवारी केला.
ममतांचा तृणमूल प्रथमच गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र, कॉंग्रेसला ते रूचलेले नाही. तृणमूलमुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होणार असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्यावरून कॉंग्रेस आणि तृणमूलमध्ये जुंपली आहे. मात्र, गोव्यात एकत्र येण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसला दिल्याचे तृणमूलकडून वारंवार सांगितले जात आहे.
अशात तृणमूलचे नेते पवन के.वर्मा यांनी नवा गौप्यस्फोट केला. काही आठवड्यांपूर्वी स्वत: ममता यांनी सोनियांशी संपर्क साधला. मागचे विसरून नववर्षात नवी सुरूवात करण्याचा प्रस्ताव ममतांनी दिला.
एकत्र येण्याच्या प्रस्तावावर कॉंग्रेसमधील सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका सोनियांनी घेतली. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. मी स्वत: सरलेल्या वर्षाच्या अखेरीस कॉंग्रेसच्या गोवा निवडणुकीचा प्रभार सांभाळणारे नेते पी.चिदंबरम यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र, कॉंग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असे वर्मा यांनी म्हटले.