नवी दिल्ली -ऑलिम्पिक स्पर्धा यंदा जपानच्या टोकियोत होत आहेत. या स्पर्धेसाठी भारताचे खेळाडूही लवकरच रवाना होणार आहेत. संपूर्ण भारत खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी चीअर फॉर इंडिया हे अभिनव अभियान सुरु केले आहे. या अभियानातंर्गत भारतातील विविध क्रीडापटू तसेच क्रिकेटपंटूनी देखील ऑलम्पिकसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑलम्पिक स्पर्धा मागील वर्षी आयोजित करण्यात येणार होत्या. पण कोरोनाच्या धोक्यामुळे स्थगित करुन यंदा घेण्यात येत आहेत. 23 जुलैपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून भारताचे 100 हून अधिक खेळाडू ऑलम्पिकसाठी पात्र झाले आहेत. भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू एमसी मेरी कोम ऑलिम्पिक ध्वजवाहक आहेत.
कुस्तीपटू बजरंग पूनिया 8 ऑगस्टला होत असलेल्या स्पर्धेच्या सांगता कार्यक्रमाला भारताचा ध्वजवाहक असेल. या खेळाडूंना शुभेच्छा देताना बीसीसीआयने ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये भारताच्या जवळपास सर्व क्रिकेटपटूंनी ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्वांनी खेळाडूंना पाठिंबा व शुभेच्छा द्या असा टॅगही बीसीसीआयने दिला आहे. या व्हिडिओत विविध क्रीडापटूंसह महिला क्रिकेटपटू व भारताचा प्रमुख क्रिकेट संघातील खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत.