नवी दिल्ली – राम लला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राला मोदी यांनी आज उत्तर दिले असून आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय अशा क्षणांचा साक्षीदार होऊन परतल्यानंतर आपल्याला हे पत्र लिहित असल्याचे त्यात पंतप्रधनांनी म्हटले आहे.
राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात मोदी त्यांना उद्देशून म्हणाले की तुमचे पत्र मिळाले तेंव्हा मी एका वेगळ्याच भावयात्रेत होतो. प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील प्रत्येक अध्याय आपल्याला सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याची प्रेरणा देतो. एक भाविक म्हणून मी अयोध्या धामची यात्रा केली. त्या पवित्र भूमीवर श्रध्दा आणि इतिहास यांचा अनोखा संगम झाला असून तेथे जाऊन आल्यानंतर माझ्या मनात विविध भावनांची गर्दी झाली आहे.
अशा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणे हे एक सौभाग्य आहे आणि जबाबदारीची जाणीव करून देणारेही आहे. मी माझ्या ११ दिवसांच्या व्रत- अनुष्ठान आणि त्याच्याशी संबंधित विविध नियमांचीही चर्चा केली होती. राम लला तेथे पुन्हा विराजमान व्हावेत यासाठी अनेक शतके संकल्प आणि व्रत केले अशा असंख्य लोकांचा आपला देश साक्षीदार आहे. १४० कोटी लोकांसह राम ललांचे साक्षात दर्शन घेणे आणि त्यांच्या त्या स्वरूपाचा साक्षात्कार होणे आणि त्यांचे स्वागत करण्याचा तो क्षण हे सगळे अवर्णनीय होते. प्रभू श्रीराम आणि भारतीयांच्या आशीर्वादाने मला तो क्षण अनुभवता आला याकरता मी कायम कृतज्ञ राहीन.
पंतप्रधानांनी आपल्या या पत्रात जनमन आणि आपल्या समाजातील अत्यंत दुर्बल अशा घटकांच्या सशक्तीकरणाच्या योजनांच्या प्रभावाचीही चर्चा केली. आदिवासी समाजाशी जोडल्या गेल्या असल्यामुळे तुमच्याशिवाय अन्य कोणाला याचे महत्व समजू शकेल? आपली संस्कृती आपल्याला कायमच समाजातील वंचित वर्गाच्या हितासाठी काम करण्याची शिकवण देते. पीएम जनमन सारख्या अनेक मोहीमा आणि अभियान आज देशवासियांच्या जिवनात मोठा बदल घडवून आणत आहेत.
प्रभू श्रीरामाचे शाश्वत विचार देशाच्या गौरवशाली भविष्याचा आधार आहेत. या विचारांची शक्तीच २०४७ पर्यंत आपल्या देशाला एक विकसित राष्ट्र बनविण्याचा मार्ग प्रशस्त करेल. श्रीरामाचे भव्य मंदिर आपल्याला यश आणि विकासाचे नवे शिखर गाठण्यासाठी कायम प्रेरणा देत राहील.