नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मोदी यांनी बादल यांचे 93 व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले. त्यांच्यातील संभाषणाचा अधिक तपशील मिळू शकला नाही.
केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या आंदोलनामुळे सध्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटत आहेत. बादल आणि त्यांच्या शिरोमणी अकाली दलानेही (एसएडी) कृषी कायद्यांविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.
कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी एसएडी काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडला. एवढेच नव्हे तर, बादल यांनी पद्मविभूषण सन्मान परत करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सोमवारी बादल यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मोदींना केली.
त्यामुळे मोदी आणि बादल यांच्यातील दूरध्वनी संभाषणाचे महत्व वाढले आहे. मात्र, त्यांच्यात वादग्रस्त ठरलेले कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबाबत काही चर्चा झाली का, ते तातडीने समजू शकले नाही.