नवी दिल्ली – महागाईच्या मुद्द्यावर मंगळवारी राज्यसभेत चर्चा झाली. त्यावेळी सत्तारूढ भाजपने महागाईसाठी जागतिक घडामोडींना जबाबदार धरले. वाढत्या महागाईवरून विरोधकांनी राज्यसभेत मोदी सरकारला धारेवर धरले. महागाईची समस्या सोडवण्यासाठी आधी ती असल्याचे मान्य करा, असे उपहासात्मक आवाहन विरोधकांनी सरकारला केले. त्या चर्चेत भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सहभागी झाले.
महागाई सगळ्यांनाच प्रभावित करते. महागाईला आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. करोना संकट आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यातून जगभरात अन्न आणि इंधनांचे दर वाढले. संबंधित जागतिक घडामोडी कुठल्याही देशाच्या नियंत्रणापलिकडील आहेत. केवळ भारतातच नव्हे; तर इतर देशांतही दरवाढीचे चित्र आहे.
मोदी सरकारने पेट्रोल आणि डीझेलवरील करांमध्ये कपात केली. त्याचे अनुकरण भाजपशासित राज्यांनी केले. भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यांनीही तसे पाऊल उचलले असते तर सामान्य जनतेवरील बोजा कमी झाला असता, असे ते म्हणाले. खाद्यपदार्थांवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी पलटवार केला. विकासकामांसाठी निधीची गरज असते. पैसा छपाई करून मिळत नाही; त्यासाठी उत्पन्नाची निश्चिती करावी लागते, अशी भूमिका त्यांनी मांडली.