कॉंग्रेससोबत आघाडीचा फैसला 31 ऑगस्टपर्यंत
मुंबई: सध्या सरकार दबावतंत्राचा वापर करत आहे. आपल्यालाही ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाला. नक्षलवाद्यांबरोबर आपला संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आपण त्यांना पुरून उरलो, असे ठणकावून सांगतानाच सत्ताधारी भाजप सरकार चिदंबरम यांच्यासारख्या विरोधकांनाच ब्लॅकमेलिंग करत नाही तर आता हे लोण पक्षांतर्गत विरोधकांपर्यंतही पोहोचले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही हे लोण पोहोचण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. भाजप सरकार हे आरएसएसचे प्यादे आहे. हे प्यादे कधीही मोडले जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
आगामी विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची किंवा नाही, त्यांना आमच्या अटीशर्ती मान्य आहेत की नाही, याचा फैसला 31 ऑगस्टपर्यंत निश्चित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयएमबरोबरची आमची युती कायम राहील. त्यांच्याबरोबरच्या जागावाटपाची चर्चा फक्त असुद्दीन ओवैसी यांच्याबरोबरच केली जाईल, असे सांगितले.
ओबीसींना एससी-एसटीप्रमाणे स्कॉलरशिप
वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाईल व क्रिमिलेयर काढण्यासाठी शासन स्तरावर एक अभ्यास गट नेमला जाईल. या अभ्यासानंतर जो निर्णय येईल त्या पद्धतीने तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. ज्याप्रमाणे अनुसूचित जाती-जमातींचे वेगळे बजेट आहे तसेच ओबीसींचेही स्वतंत्र बजेट करून त्यांच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल. त्यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद करताना स्कॉलरशिपसाठी वाढीव महागाई निर्देशांकानुसार ती ठरवण्यात येईल, असेही आंबेडकर म्हणाले.