सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतिपदांच्या निवडी गुरुवारी (दि. 9) होणार असून इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सकाळी नऊ वाजता बैठक होणार असून या बैठकीत सभापतींची निवड होणार की अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसारखे पक्षश्रेष्ठी फोनवरुन नावे सांगणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून गेल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी आ. मकरंद पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी खंडाळ्यातील उदय कबुले यांना अध्यक्षपद तर माजी आमदार शशिकांत शिंदे यांना ताकद देण्यासाठी खटावच्या प्रदीप विधाते यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यामुळे वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव, खटाव या मतदारसंघात आता सभापतिपद मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
माण तालुक्यातील डॉ. भारती पोळ आणि सोनाली पोळ यांच्यात महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी रस्सीखेच असून सोनाली पोळ यांची निवड निश्चित मानली जात आहे. शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदी ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे यांना संधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सलग दोन वेळा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी हुकल्याने जगदाळे नाराज असल्याचे बोलले जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर सभा संपण्यापूर्वीच त्यांनी सभागृह सोडले होते. जगदाळे यांनी हे पद स्वीकारावे, अशी पक्षाची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. जगदाळे यांनी सभापतीपद स्वीकारण्यास नकार दिला तर सातारा- जावळी मतदारसंघात हे पद येऊ शकते.
कुडाळचे दीपक पवार आणि कुसुंबीच्या अर्चना रांजणे, शेंद्रे गटातील शिवाजीराव चव्हाण या पदासाठी इच्छुक असून शिक्षण सभापतिपद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. कृषी समितीचे सभापतिपद फलटण- कोरेगाव मतदारसंघात जाण्याची शक्यता आहे. फलटणचे धैर्यशील अनपट आणि पिंपोडे गटाचे मंगेश धुमाळ या पदासाठी इच्छुक असून दोघेही संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय आहेत.
ऐनवेळी पक्ष कोणाला संधी देणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. समाजकल्याण समितीचे सभापतिपद पाटण तालुक्याला मिळण्याची शक्यता असून हेळवाक गटाचे बापूसाहेब जाधव यांना पक्ष संधी देणार असल्याची चर्चा आहे. पाटण तालुक्यात पाटणकर गटाला ताकद देण्यासाठी एक सभापतिपद देणे गरजेचे असल्याने बापूसाहेब जाधव यांची निवड निश्चित मानली जात आहे.
या पदासाठी वाठार स्टेशनचे डॉ. अभय तावरेही इच्छुक आहेत. सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज दाखल करण्यात येणार असून दुपारी दोन वाजता विशेष सभा होणार आहे. अर्जांची छाननी होऊन माघारीची मुदत संपल्यानंतर गरज पडल्यास मतदान होणार आहे. त्यानंतर दुपारी अडीच वाजता निवडीची अधिकृत घोषणा होईल.