निष्काळजीपणे वाहने उभी करणाऱ्यांवर दंडवसुलीची कारवाई
मंचर -मंचर शहरातील वाहतूक समस्या डोकेदुखी बनू लागल्याने वाहनचालकांवर मंचर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. वाहनांना जामर लावूनन दंडवसुली केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
रस्त्यात उभ्या आडव्या असणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जामर लावण्याचे काम पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक पोलीस करत असून, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. लक्ष्मी रस्ता, चंद्रशेखर आण्णा बाणखेले मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, घोडेगाव रोड या रस्त्यांवर मुख्य बाजारपेठ असल्याने शहरात खरेदीसाठी व इतर कामांसाठी आलेले नागरिक आपली वाहने निष्काळजीपणे कोठेही उभी करून इतरत्र कामानिमित्त जातात, त्यामुळे इतर रहदारीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी होत आहे.
याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्याने पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांनी या तक्रारींची दखल घेत वाहतूक कोंडी करणाऱ्या आणि रस्त्यात उभ्या असणाऱ्या वाहनांना जामर बसवून दंडात्मक कार्यवाई सुरू केली आहे.
ही कार्यवाही मंचर पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक पोलीस डी. एस. जाधव, एस. के. काळोखे, एन. बी. लोखंडे, हनुमंत शिंदे,राजू डांगे यांनी केली. बाजारपेठांतील दुकानदार, चालक-मालक व इतर व्यापाऱ्यांना वाहने न लावण्याच्या सूचन, दिल्या असून, रस्त्यावर निष्काळजीपणे वाहने दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.