नवी दिल्ली : भारतात दरवर्षी दोन लाख यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असताना दरवर्षी केवळ काही हजार यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. अधिकाधिक सार्वजनिक रुग्णालयात यकृत प्रत्योरोपण कार्यक्रम सुरू करण्याची गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे.
आयएलबीएस अर्थात यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेचा दहावा स्थापना दिन आणि सातव्या दीक्षांत कार्यक्रमात ते आज नवी दिल्लीत बोलत होते.
यकृत दानासाठी प्रोत्साहन, सध्यापेक्षा जास्त यकृत प्रत्यारोपणासाठी आवश्यक पायाभूत संरचना बळकट करण्यासाठी मार्ग सुचवणारा पथदर्शी आराखडा तयार करण्याचे आवाहन त्यांनी आयएलबीएसला केले.
यकृताच्या वाढत्या आजाराचा, अनारोग्यकारी जीवनशैलीशी संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. अवयव दानाला प्रोत्साहन देऊन त्याबाबत जागृती करण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली. जीवनदान देण्यासाठी अवयवांची मागणी आणि उपलब्धता याच्यात मोठी तफावत आहे. अवयवदानाविषयी जागृतीचा अभाव असल्यामुळे दात्यांची संख्या कमी असल्याचे ते म्हणाले.