आळंदी (ज्ञानेश्वर फड ) -चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू । भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू ।संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातील वारकरी आता तयारीला लागले आहे. तर काही वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीकडे रवाना झाल्या आहेत. पैठण, शनिशिंगनापूर, शिर्डी, वणी, नाशिक, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, तुळजापूर, कोल्हापूर, देहू असे विविध धार्मिक स्थळे, देवस्थानांना भेटी देत आळंदीला शुक्रवारी (दि. 9) पर्यंत पोहोचणार आहेत, असे दिंडी प्रमुखांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
दर्शनबारी व्यवस्था पूर्णत्वाकडे
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यासाठी देवस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली असून नदीपलीकडे तात्पुरती दर्शनबारी उभारणीचे काम पूर्णत्वास येत आहे. 11 तारखेला प्रस्थान सोहळा असल्यामुळे भाविक, वारकरी हे 9 ते 10 तारखेपर्यंत आळंदीत दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळी भाविक माऊलींचे समाधी दर्शन करतात. त्यामुळे देवस्थानकडून ही तात्पुरत्या दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस मदत, टेहळणी केंद्र स्थापन
पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन सज्ज होत असून आळंदीतील प्रमुख चौक तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र, टेहळणी केंद्राची उभारणी करण्यात आली असून काही ठिकाणी उभारणीचे हे काम सुरु आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यावर्षी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे.