साधारणतः पावसाळ्याचे चार महिने वगळता इतर ऋतूत, महिन्यांत पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हटले जाते. पूर्वी हा पाऊस अचानक आणि कधी तरी पडायचा म्हणून त्याचे अवकाळी असे नामकरण केले गेले असावे. पण अलीकडील काळात तो नियमित स्वरूपात पडत आहे. राज्यात चालू वर्षात पहिल्या महिन्यापासून आजपर्यंत प्रत्येक महिन्यात कोठे ना काठे गारपिटीसह विजेच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळत आहेत. अवकाळीची ही नियमितता शेतकऱ्यांसाठी, पिकांसाठी आणि एकंदरीतच कृषीव्यवस्थेसाठी मारक ठरणारी आहे.
भारताला मोसमी पावसाची देणगी लाभली असून दरवर्षी हंगामात तो कमी-अधिक प्रमाणात बरसतोच. पण बदलत्या चक्रामध्ये हवामान अधिकच लहरी होत असल्याचा अनुभव येत आहे. पूर्व मोसमी आणि अवकाळी मिळून सध्या आणि मागील पूर्ण वर्षात राज्यात कोणत्या ना कोणत्या विभागात बारमाही पाऊस पडतो आहे. राज्यात गेले सलग 5-6 महिने गारपिटीने दाणादाण उडवून दिली. 2021 या नव्या वर्षातील पहिल्या महिन्यापासून आजपर्यंत सातत्याने गारपिटीसह विजेच्या कडकडाटांसह सरी कोसळत असल्याने हा सलग 15 वा महिना ठरला आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेले कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळे यामुळे देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातही सध्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत होत आहे. हातातोंडाशी आलेल्या शेतीचेही अतोनात नुकसान होत आहे. 2020 मध्ये जानेवारीच्या सुरुवातीलाच ऐन थंडीत विदर्भात गारपिटीने पिकांची दाणादाण उडवून दिली, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाने शेतीचे नुकसान केले होते. आजही तीच परिस्थिती आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यातही पुन्हा मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपीट आणि धुवाधार पाऊस होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात मराठवाडा, विदर्भाने पुन्हा गारपीट सोसली आहे. 25 मार्चला मराठवडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना वादळी पावसाने झोडपून काढले आहे. एप्रिल महिन्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्याच्या अर्थव्यस्थेला मोठा फटका बसत असतानाच अवकाळी पावसाने त्यात भर घातली आहे. 18 एप्रिलपासून काही भागांत वादळी पाऊस आणि गारपीट होऊन शेतीमाल, फळबागांचे नुकसान झाले आहे. कोकणामध्ये आंब्यालाही पावसाने तडाखा दिला.
आजपर्यंत चक्रीवादळांची मालिका आणि चक्रीवादळांचे महाचक्रीवादळात होणारे रूपांतर पाहता ऍम्फी, निवार, गती, निसर्ग आणि बुरेवी या चक्रीवादळांनी गेली 15 महिने धुमाकूळ घातला आहे. निसर्ग आणि गती हे अरबी समुद्रात तर इतर तीन चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागरात तयार झाली होती. निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने महाराष्ट्रात हाहाःकार उडवून दिला. त्यात महाराष्ट्रात प्रचंड असे नुकसान केले. गेल्या दहा वर्षामध्ये वातावरण किंवा पर्यावरणामध्ये विलक्षण स्वरूपाचे बदल झालेले पाहायला मिळताहेत. याचे परिणाम केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या सर्वच देशांना सोसावे लागत आहेत. आतापर्यंत ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जगामध्ये तापमान वाढत असल्याची चर्चा ऐकू येत होती. पण आता एकूणच हवामानामध्ये प्रचंड उलथापालथ होताना दिसून येते. भारतासारख्या विकसनशील देशात ही बाब अगदी ठळकपणे नजरेस येते.
गेल्या दोन वर्षांतच इतक्या वेगवेगळ्या प्रकारची छोटी-छोटी चक्रीवादळे आली की त्याचा हवमानावर परिणाम झालेला दिसून आला आहे. मुंबईसारखे महानगर अतिवृष्टीमुळे ठप्प होते आणि एकाच वेळी त्याचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव जाणवतो. अवकाळी पाऊस हा तर अलीकडच्या काळातील नेहमीचाच प्रकार ठरू लागलेला आहे. त्याला आपण अवकाळी जरी म्हणत असलो तरी न चुकता दर दोन-चार महिन्यांनी येत असल्याने तो नियमितच झाल्याचे दिसत आहे. यामुळे राज्यात शेतमालाचे किंवा शेतीउत्पादनाचे होणारे नुकसान अपरिमीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या हवामान बदलाचा विचार केला तर त्यासंदर्भात खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ निसर्गातला बदल मानून त्याकडे दुर्लक्ष करून परवडणारे किंवा चालणार नाही. अशा वारंवार होणाऱ्या बदलांचा अभ्यास अधिक आवश्यक ठरतो आहे. त्यातील परिणाम सातत्याने लक्षात घेऊन तशा उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी कृतीआराखडे करावे लागतील.
संकटे ही नेहमीच एकमेकांना हाकारे घालत येतात असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय सध्या करोनाकाळातील अवकाळीने येत आहे. जून ते सप्टेंबरमधला पाऊस शेतीसाठी चांगला आणि इतर वेळचा पाऊस शेतीसाठी मारक. म्हणून त्याला अवेळी आलेला म्हणतात. त्यातच हा पाऊस म्हणजे नुसते पाणी नव्हे, तर गारांचा मारा. वास्तविक दरवर्षी या सुमारास तो येतोच. फक्त त्याचे प्रमाण कमी-अधिक असते. हिवाळा संपताना आणि उन्हाळा सुरू होताना अशा प्रकारचा पाऊस हा उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हमखास येतो. त्याचे प्रमाण नैऋत्य मोसमी पावसाच्या तुलनेत अत्यल्प असते, पण यामुळे शेतपिकांचे होणारे नुकसान मात्र जास्त असते. त्यामुळे अवकाळी येणारा हा पाऊस शेतकऱ्यांना नकोसा वाटतो. अशातच विजेचा झटका (शॉक) बसून, अंगावर वीज कोसळून होणारे दुर्दैवी मृत्यू, घरांची मोडतोड, जनावरांना होणारा त्रास अशा अनेक घटना घडत असतात. वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडतात. शेतकरी राजाने काढून ठेवलेली पिके ही पालापाचोळ्या सारखी उडून जातात.
आज देशाबरोबरच राज्यही अत्यंत मोठ्या संकटांनी ग्रासलेले आहे. संकटाची व्याप्ती आर्थिक पाहणी अहवालाने दाखवून दिली आहे. त्यातच अवकाळी पावसाने कृषीक्षेत्राची चिंता वाढलेली आहे. करोनाच्या काळात उद्योगव्यवस्था ठप्प झाली तेव्हा कृषीक्षेत्र एकटेच होते ज्याने जीडीपीला आणि पर्यायाने अर्थचक्राला हातभार दिला. पण आज अस्मानी संकटाने शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांचे तारणहार असलेल्या राज्य सरकारकडून शेतकऱ्याला मोठी आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी अधिक प्रयत्न आवश्यक आहेत. वादळीवाऱ्यासह गारपीट झालेल्या विभागात नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने होणे आणि तात्काळ योग्य नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होता कामा नये. कर्जमाफीप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळाल्यास मोडकळीस आलेले संसार ते सावरू शकतील. त्यामुळे केवळ कागदी घोडे न नाचविता हात दिला तरच नुकसानग्रस्त बळीराजाला हिमतीने पुन्हा उभे राहता येईल.
भारतीय हवामान (खात्याच्या) विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून सामन्य असेल आणि 98 टक्के पर्जन्यमानाची शक्यता आहे. खरेतर जे काही निसर्गाचे ऋतुचक्र आहे ते ठरल्याप्रमाणे फिरत असते. फक्त त्यामध्ये कधी कधी मागे पुढे होते. पावसाळा वेळेवर असणे आणि पुरेसा पाऊस कोसळणे म्हणजेच संपूर्ण वर्षभराची ती आनंदवार्ता म्हणावी लागते. कारण या पुरेशा पावसामुळे संपूर्ण वर्ष सुखासमाधानाने जाण्याची शाश्वती मिळत असते. करोनामुळे अंधःकारलेल्या या वातावरणात पर्जन्यवृष्टी जर समाधानकारक झाली, तिचे वितरण योग्य प्रकारे झाले तर आशेची पालवी फुटेल. याउलट पावसात खंड पडणे, ढगफुटी होणे, अतिवृष्टी होणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले तर संकटाचे गहिरेपण वाढेल.
आज गारपिटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाच पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. करोनामुळे बहुसंख्य ठिकाणचे आठवडे बाजार बंद झाले आहेत. बाजारपेठेत औदासिन्याचे वातावरण आहे. शेतमालाला सध्या उठाव कमी आहे. नगदी पिकाच्या भरोशावर असलेला शेतकरी हताश झाला आहे. अवकाळी आणि करोनाच्या संकटाचा एकूणच विचार करता शेतकऱ्यांना राज्यासह केंद्राचीही मदत मिळवायला हवी. कारण या संकटांमुळे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पार ढेपाळली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका दिसू लागल्यानंतर केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा उद्योगांना दिलासा देण्यासाठी काही सवलती दिल्या जातील अशी चर्चा सुरू आहे. त्याच धर्तीवर अवकाळीच्या सततच्या संकटाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजालाही मदतीचा हात दिला गेला पाहिजे.
– मोहन एस. मते,