पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- सार्वजनिक वाहतुकीसाठी ई- बस वापरण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. पण, पीएमपीकडून सुमारे ४०० सीएनजी बसेस भाडेकराराने घेण्याची निविदा काढण्यात आली आहे. तुलनेत ई-बसच्या इंधनाचा (विजेचा) दर कमी असल्याने पीएमपीला त्याचा फायदा होणार आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
प्रशासनाने तातडीने ही निविदा रद्द करून ई-बसच घ्यावात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाबू वागसकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे कामगार सेना उपाध्यक्ष केतन नाईक, पक्षाचे राज्याचे सरचिटणीस अजय शिंदे यावेळी उपस्थित होते. वागसकर म्हणाले, पर्यावरणाच्या अनुषंगाने ई-बस शहरासाठी महत्वाच्या आहेत. या बसची खरेदी प्रक्रिया दीड वर्षांपासून सुरू असताना अचानक पीएमपीकडून त्या ऐवजी ४०० सीएनजी बस भाडेकराराने घेण्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांसाठी ४ ठेकेदार आले असून त्यांना हे काम विभागून दिले जाणार आहे.
तसेच सध्या बस पुरवित असलेले ठेकेदारच या निविदांंमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे ऐन निविदांच्या तोंडावर ई- बसऐवजी सीएनजी बस घेण्याची गरज का? असा सवालही मनसेने उपस्थित केला. ई- बसच्या तुलनेत सीएनजीला येणारा खर्च जादा असल्याने पीएमपीचे पुढील दहा वर्षांत सुमारे साडेतीनशें कोटींचे नुकसान होणार असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला आहे.