रब्बी हंगामातील पिकांना बसणार फटका
आळेफाटा – आळेफाटा आणि परिसरात, तसेच जुन्नर तालुक्यातील काही भागांत बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी ऑक्टोबरअखेरपर्यंत पावसाने हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन, भुईमूग फळबागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होत. पावसाने उघडीप न दिल्यामुळे गव्हाच्या पेरण्याही उशिरा झाल्या होत्या.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झालेला असून वातावरण ढगाळ झाले आहे. गेले काही दिवस पडत असलेली थंडी अचानक गायब झाली, त्याचा परिणाम पिकांवर होऊ लागला होता.
पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकरी कीडनाशक फवारणीकडे वळला असतानाच आज (दि. 25) अचानक अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. यामुळे गहू, हरभरा ही पिके हातची जाणार का, या भीतीने शेतकरी त्रस्त झाला आहे. याबरोबरच तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी देखील धास्तावला आहे.