नवी दिल्ली – प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे चिंतन शिबीर अपयशी ठरल्याचं म्हणत प्रशांत किशोर यांनी उदयपूर चिंतन शिबिरातून काँग्रेस पक्षाला काहीही मिळाले नसल्याचं टीका केली.
काँग्रेसच्या चिंतन शिबिरातून काँग्रेस नेतृत्वाला म्हणजेच गांधी घराण्याला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अधिक वेळ मिळाल्याचं किशोर यांनी नमूद केलं. यासोबतच प्रशांत किशोर यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव होईल अशी शक्यताही वर्तवली आहे.
मला वारंवार उदयपूर चिंतन शिबिरावर मत व्यक्त करण्यास सांगण्यात येत आहे. परंतु माझ्या मते, उदयपूर चिंतन शिबिरात कोणताही अर्थपूर्ण उद्देश पूर्ण करण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. या शिबिरामुळे काँग्रेस नेतृत्वाला किमान गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांपर्यंत आणखी काही काळ मिळाला आहे. अर्थात चिंतन शिबिरात पक्षाने गांधी घराण्याचे अस्तित्व टिकवल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं. किशोर यांनी एप्रिलमध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी 600 पानांचे सादरीकरण दिले होते.
काँग्रेसने उदयपूरमध्ये तीन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 400 हून अधिक प्रमुख नेते सहभागी झाले होते. शिबिरात काँग्रेसने एक कुटुंब-एक तिकीट, तरुणांना संघटनेत आरक्षण, देशभर पदयात्रा काढणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की, आम्ही पुन्हा जनतेमध्ये जाऊ, त्यांच्याशी आमचे संबंध दृढ करू आणि हे काम शॉर्टकटने होणार नाही. हे काम मेहनतीने पूर्ण होईल.