मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले होते. राणे यांना काल अटक व जामिनही देण्यात आला आहे. मात्र हा वाद आणखी सुद्धा निवळलेला दिसून येत आहे. आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला.
आमदार लाड पत्रात म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रेचा प्रमुख म्हणून मी नारायण राणे यांच्यासोबत होतो. पोलिसांकडून नारायण राणेंना जी वागणूक मिळाली, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. पण जेव्हा पोलिसांची त्यांच्याशी वागण्याची पद्धत बदलली. मी पोलिसांकडे कागदपत्रं मागितली, पण ते देऊ शकले नाहीत. राणेंविरुद्ध कारवाई जी त्यांच्या डोक्यात होती, ती ते करू शकले नाहीत, असं लाड यांनी नमूद केलं.
दरम्यान संपूर्ण प्रकरण झाल्यानंतर मध्यरात्री २ वाजनंतर आपल्याला धमक्यांचे सात-आठ फोन कॉल आले. यापैकी काही फोन मराठीत तर काही हिंदीत होते. आपल्या शिवीगाळ करण्यात आली. ठार मारण्याच्या, घर आणि ऑफीस जाळून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या. आपण या धमक्यांना घाबरत नाही. तरीही विधानपरिषदेचा आमदार म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे. माझ्या जीवाला काही झालं तर त्याला शासन जबाबदार असेल, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
केंद्रीयमंत्री राणे यांनी छोटसं वक्तव्य केलं, त्यामुळे त्यांच्यावर एवढी मोठी कारवाई होते. मग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य देखील आक्षेपार्ह आहे. यावर कायदा न्याय देईल का, असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला आहे.