मुंबई – काँग्रेस पक्षाने राज्यातील पक्ष संघटनेत मोठे बदल केले. नाना पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांच्यावर देखील मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळताच प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाने उंटावरून शेळ्या राखणे आता बंद करावे. जनता आता हुशार झाली आहे, अशी टीका प्रणिती यांनी केली आहे. अमित शाह महाराष्ट्रात आले किंवा नाही आले तरी काही फरक पडणार नाही, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी ही विश्वासाने पार पडणार आहे. पक्षाची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार, सर्वजण पक्षात एक टीम म्हणून काम करणार आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सध्या शक्ती विधेयक ड्राफ्ट होत आहे. महिलांसाठी आपली शक्ती लावणार असून त्यांच्या प्रश्नी आवाज उठवणार आहे. महिलांना संघटित करुन त्यांच्या प्रश्नी अन्यायाविरोधात आवाज उठवणार आहे, असं शिंदे म्हणाल्या.