मुंबई: पुढचा विरोधी पक्ष नेता वंचितचा असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी वंचितची ताकद वाढल्याचे मान्य केले आहे. त्यांनी चारिटेबली आम्हाला विरोधी पक्षनेते पद दिले. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो वंचितचा मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांना प्रत्युतर दिले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आपली व्यूहरचना जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही दिलेली 144 जागांची ऑफर घेऊन चर्चेसाठी दारे कधीही खुली आहेत. कॉंग्रेसला प्रस्ताव देऊन दोन आठवडे झाले आहेत. अद्याप त्यांच्या कोणत्याही नेत्यांकडून आम्हाला संपर्क झालेला नाही. अनेक नेते दिल्लीवारी करून आले, पण अजून संपर्क नाही.
आम्ही पक्षांतर्गत ठरवले होते की आपण कॉंग्रेसला जी ऑफर दिली आहे 144-144ची त्यावर काही उत्तर येत का? याची वाट पाहायची. तसे नाही झाले तर आपल्या स्ट्रॅटेजीला लागायच. आम्ही रणनीती तयार केली आहे. या आठवड्यात ती जाहीर करू. 8 सप्टेंबरला नागपूर संविधान चौकातून रॅली निघेल. प्रत्येक दिवसाला 2 ते 3 जिल्हे कव्हर केले जातील. 18 तारखेला कोल्हापूरमध्ये समारोप होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली. तसेच एमआयएम आमच्यासोबत आहे. त्यांच्याबरोबर आमची युती पक्की आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.