मुंबई – राज्यात प्रत्येक पक्षामध्ये गटातटाचे राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय पक्षांसह स्थानिक पक्षांनी देखील आता २०२४ च्या लोकसभेची (loksabha 2024) तयारी सुरु केली आहे.राज्यातील विरोधक इंडिया (India aghadi) आघाडीत एकत्र आले असले तरी जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. शिवसेना (ठाकरे गट ) ने प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केलेली आहे. मात्र वंचितने अद्याप इंडिया आघाडीत प्रवेश केलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जागावाटपाबाबतचा सस्पेन्स कायम असताना प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत भाष्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर हे सध्या इंडिया आघाडीपासून दूर आहेत. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे इंडिया आघाडीसह राज्यात देखील मविआ सोबत आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या वाट्याला येणाऱ्या जागा ते वंचित सोबत शेअर करणार की वंचित देखील माविआसोबत येणार हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. अशात आगामी लोकसभेच्या जागावाटपावर आणि शिवसेनेबरोबरच्या युतीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाची टिपण्णी केली आहे.
“जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. आमची निवडणुकीसंदर्भात काय भूमिका आहे त्याचा संदेश आम्ही शिवसेनेपर्यंत पोहोचवला आहे” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
“महाविकास आघाडीतल्या (Mva) जागावाटपातील जागा निश्चित झाल्यानंतर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतल्या जागावाटपाचा भाग सुरू होईल असंही आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेच सगळ्याच शक्यता लक्षात घेत आणि अगदी वाईटात वाईट शक्यताही लक्षात घेत, जर कोणाचीच कोणाशी युती होणार नाही असं गृहित धरून आम्ही राज्यातील ४८ जागांच्या तयारीला लागलो असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.