Prakash Ambedkar – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेऊन पूजा, आरती केली. नंतर अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाची हेलिकाॅप्टरमधून पाहणी करून जलपूजन करण्यात आले.
तसेच धरणाच्या डाव्या कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर शिर्डीजवळील काकडी गावातील भव्य सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र या पंतप्रधान मोदींच्या (Pm Narendra Modi) या दौऱ्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ग्रामपंचायत सरपंच (Sarpanch) झाले म्हटल्यानंतर काय बोलणार?
एखाद्या गावात कुठेही काहीही झालं तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे. म्हणूनच मी म्हणतोय की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून आता सरपंच झाले आहेत’. अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.