मुंबई : देशात जगभरातील नेत्यांची जी २० शिखर परिषदेसाठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. त्यात अनेक देशांसोबत भारताचे अनेक मुद्द्यांवर करार होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाच खडे प्रश्न विचारले आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल चिकटवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझे काही प्रश्न आहेत.” यात त्यांनी चीनपासून मणिपूर हिंसाचार, देशातील मैला उचलण्याच्या कामातील कामगार आणि अल्पसंख्याकांना ठेचून मारण्याच्या घटनांचा समावेश आहे.
प्रकाश आंबेडकरांचे ५ प्रश्न
* इंडोनेशियामध्ये झालेल्या एशियन (ASEAN) शिखर संमेलनात भाषण करताना नरेंद्र मोदींनी कितीदा चीनचा उल्लेख केला?
* रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्लीतल्या जी २० संमेलनाकडे (G20Summit) पाठ का फिरवली आहे, हे मोदी सांगू शकतील का?
* रशिया आणि चीनला मान्य व्हावे म्हणून युक्रेन युद्धावरच्या परिच्छेदात भारताने सुचवलेले बदल अमेरिका, इंग्लंड, युरोपियन युनियन आणि इतर पाश्चिमात्य देशांनी धुडकावून लावले आहेत हे खरे आहे का?
* वर्षभराच्या अध्यक्षीय काळात चीन आणि रशियाचा विरोध पाहता युक्रेन युद्धाचा साधा उल्लेख असणारे किती संयुक्त निवेदने किंवा सर्वानुमते दस्तावेज निघाले?
* दिल्लीतल्या संमेलनात कोणत्याच नेत्यांची घोषणा न होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे का? ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची घोषणा जाहीर होऊ शकली नाही, असा पहिला देश बनण्याची नामुष्की भारतावर ओढवणार आहे का? आणि यामुळे संपूर्ण जगात भारताची नाचक्की होणार नाही का?
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीत वंचितला सहभागी करून न घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं. भाजपा-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.” असा आरोप देखील त्यांनी केला होता. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या पाच प्रश्नावर आता राज्यातील भाजप नेत्यांकडून काय उत्तर येते हे पाहणे गरजेचे आहे.