सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरा का होईना जाग
जामखेड: शहरातील रस्त्यांची पावसामुळे पुरती वाट लागली असून चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची पुन्हा चाळण झाली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळातच वाहनधारक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे वृत्त दि. २६ रोजी ‘दैनिक प्रभात’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच झोपेचे सोंग घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरा का होईना जाग आली. आणि आज शहरातील नगर रोड वरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नगर रोड-बीड रोड- खर्डा रोड या रस्त्यावर तब्बल दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग कडे कानाडोळा करत आहे. परिणामी पावसाच्या आगमनाने शहरातील या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालक, पादचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना या मार्गावरून वाट काढणे जिकिरीचे झाले आहे. मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहनचालकांचे मोठ्या हाल होत होते. आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्यांवर मुरुम टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पुन्हा चार दिवसांपासून सुरु झालेल्या रिपरिप पावसाचा परिणामामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचा त्रास वाढला होता. खर्डा रोड,बीड रोड ,नगर रोड आदींवर चिखल व खड्ड्यांचा त्रास वाढला आहे.
शहरातील रस्त्यावर पाय ठेवणे जिकिरीचे झाले असून वाहतूक कोंडीची समस्यादेखील भीषण रूप घेत आहे. वाहनांचे लहानसहान अपघात, विद्यार्थी व लोकांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे, असे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे जेरीस आलेल्या येथील नागरिकांनी रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण जेव्हा हाईल तेव्हा होईल, मात्र तत्पूर्वी रस्त्यावरील खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी केली होती. याबाबत दैनिक प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली असून वाहनधारकसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही खड्डे बुजवण्याबबत निवेदन दिले होते