हिमांशू
“दुनिया दोन हातांची रे बाबा दुनिया दोन हातांची। दोन हातांमधल्या या वितभर भगवन् मंदिराची रे बाबा… दुनिया दोन हातांची।।’ राबणाऱ्या हाताला “देवपण’ देणारी ही शाहीर अमर शेख यांची रचना. पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नव्हे तर श्रमिकाच्या तळहातावर तोललेली आहे, असं सांगून “प्रारंभी मी आजला कर ज्याचा येथे पुजिला’ असा गण लिहिणारे शाहीर अण्णा भाऊ साठे यांचेच विचार अमर शेख यांनी थोड्या वेगळ्या अंगानं सांगितले.
“सौंदर्ये तुज रिझवायाला। दगडामधुनी देव निर्मिला।। याच हातांनी देव घडविला। काढू साक्ष कुणाची?’ असा प्रश्न ते या कवनात विचारतात. देवाची निर्मिती कुणी आणि कशासाठी केली, याबाबत काळाच्या प्रत्येक टप्प्यावर मंथन होत आलंय. संकटात मदतीला धावून येणाऱ्याला आपण “देवासारखा धावून आलास,’ असं म्हणतो.
कुणी गणपतीबाप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून आईवडिलांना देव मानतो तर कुणासाठी त्याचा गुरू देवासमान असतो. कंपनीत काहीजणांसाठी बॉसच देव असतो. राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं नेता देवासमान असतो. राजकीय पक्षांनी एकमेकांकडे कितीही बोटं दाखवली तरी प्रत्येक पक्षात नेत्याला देवत्व आणि त्यातून येणारं एकचालकानुवर्तित्व असतंच. परंतु हे देवत्व थेट मंदिराच्या रूपानं समोर आलं तर वादविवाद आणि चर्चा होणारच! पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारल्याची घटना अशीच अचानक चर्चेत आली.
मंदिराच्या उभारणीची जशी चर्चा झाली, तशीच ते रातोरात हटवण्याच्या प्रक्रियेचीही झाली. थेट पंतप्रधान कार्यालयातूनच कानपिचक्या दिल्या गेल्यामुळे मंदिर हटवलं, अशी चर्चा आहे. चर्चेचा काळ अगदी लहान आहे; पण तो राजकीय टीकाटिप्पणीनं गाजला, एवढं खरं. खरं तर हल्ली कोणत्याही पक्षाचा कुठलाही राजकीय इव्हेन्ट अगदी पूर्वीच्या काळातल्या लग्नकार्यासारखा चांगला सात-आठ दिवस गाजतो. त्या तुलनेनं या मंदिराची जी काही चर्चा झाली ती विरोधकांच्या आंदोलनामुळे. या मंदिरातल्या देवाला पेट्रोल आणि डीझेलचा नैवेद्य दाखवला गेला. नवसही बोलला जाणार होता म्हणे! पण तत्पूर्वीच मंदिरातून पुतळा हटवण्यात आला.
विरोधक म्हणाले, “आम्ही समस्या घेऊन देवळात आलो होतो. परंतु आम्हाला देवच दिसत नाही. आता देव चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत करतो.’ आता देऊळसुद्धा झाकून ठेवलंय. उलटसुलट चर्चा होत राहतील. त्या आपल्याकडे सगळ्याच विषयांवर होतात. कुणी स्वतःच्या अंतरंगात न डोकावता चेष्टामस्करी करेल तर कुणी देऊळ न बांधताही एखाद्याला देवत्व कसं, कधी, कुणी दिलं होतं याविषयी वाद उकरून काढेल. सोशल मीडिया तर अशा वेळी या मंडळींसाठी वरदानच ठरतो. परंतु तिथं गर्दी करण्याबरोबरच प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारावेत, अशी ही वेळ आहे.
एखाद्याला देवत्व देण्याचे फायदे-तोटे असतातच. “आप कहते हैं तो ठीक ही होगा,’ असं म्हणणारा कार्यकर्ता आपल्याला अनेक वर्षांपूर्वी “नायक’ या हिंदी चित्रपटात दिसला होता. आपल्यापेक्षा वयानं, विद्येनं, अनुभवानं, योग्यतेनं मोठ्या असणाऱ्या माणसाच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेणं चांगलंच असतं. काही सदा दुर्मुखलेली माणसं अशा गोष्टींना “थोतांड’ मानून तोंडसुख घेतात ते सोडा; पण सध्याच्या जागतिक संकटकाळात वादांच्या पलीकडे जाऊन आपण देवत्वापेक्षा मनुष्यत्व जपणंच चांगलं!