जपानशी अधिक निकटचे आर्थिक संबंध होणार
टोकियो, दि. 26 – भारताशी अधिक निकटचे आर्थिक संबंध प्रस्थापित करावेत, अशी विनंती जपानचे परराष्ट्रमंत्री हाटोयामा यांनी सरकारला केली आहे. नुकत्याच केलेल्या दौऱ्याबाबत मंत्रिमंडळास अहवाल सादर करताना हाटोमाया यांनी हे सुचविले.
भारत-नेपाळ सीमेवर तस्करी?
नवी दिल्ली – भारत-नेपाळ सीमेवर आणि महाराष्ट्र व कर्नाटकच्या किनाऱ्यावर चोरट्या व्यापारात वाढ झालेली नाही, असे आज राज्यसभेत अर्थमंत्री एच. एम पटेल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
6 वर्षांत देशात 5 नवी अणूवीज केंद्रे
नवी दिल्ली- पुढील 6 वर्षांमध्ये 5 नवीन अणूवीज केंद्रे उभारण्यात येण्याचा संकल्प आहे. राणाप्रताप सागरावरील राजस्थान अणूवीज केंद्राचा दुसरा विभाग वर्षाच्या अखेरीपर्यंत कार्यान्वित राहील. त्याची क्षमता 200 मेगावॅट राहील.
एक 235 मेगावॅट क्षमतेचे केंद्र तामिळनाडूतील कल्पक्कम येथे असेल. ते 1979 मध्ये सुरू होईल. तितक्याच शक्तीचा एक विभाग दोन वर्षांनंतर सुरू होईल. उत्तर प्रदेशातील नरोरा येथे दोन विभाग असून 1982 व 1983 मध्ये ते कार्यान्वित होतील.