हिंजवडी – विधान परिषदेवर ज्याप्रमाणे राज्यपालांच्या अखत्यारीत वेगवेगळ्या संवर्गातील लोकप्रतिनिधींची आमदार म्हणून नियुक्ती केली जाते. याच धर्तीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर नियुक्त झालेल्या संचालकांसाठी एक प्रतिनिधी विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे यांनी केली आहे.
विनोदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तथा शरद पवार तसेच सहकार अन्य मंत्री महोदयांकडे लेखी निवेदन देत केली आहे. या अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात साखर उद्योग सहकाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करीत असून साखर धंद्यावर आधारित अनेक मोठमोठे लघु उद्योग तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून साखर उद्योग काम करीत आहे.
यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले संचालक आमदार म्हणून नियुक्त केले तर शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. असे विनोदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शासन जसे पदवीधर, सामाजिक, शिक्षण, नाट्य-सिने क्षेत्रातील व्यक्तींना विधान परिषद किंवा राज्यपाल कोट्यातून आमदार सदस्य देऊन सन्मान करते त्याचप्रमाणे राज्यातील प्रवचनकार, कीर्तनकारांना देखील वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमदारपद देऊन सन्मान केला तर संप्रदायातील अनेक समस्या सुटू शकतील. त्यामुळे भक्तीशक्तीचे एक अभेद्य नाते तयार होऊन छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा यथोचित आदरसन्मान केल्याचे समाधान राज्यकर्त्यांना लाभेल.
वरील सर्व बाबी विचारात घेता राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकरिता शासन नियुक्त दोन आमदारपदे निर्माण करण्याकरिता आपण सर्वतोपरी विचार करण्यासाठी चालू अधिवेशनात यावर ऊहापोह करून सर्वांनी चर्चा करावी व या दोन्ही घटकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विनोदे यांच्या वतीने करण्यात आली आहे.