मायणी – खटाव-माणमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देऊन तालुक्याचा कायापालट घडविण्यासाठी प्रभाकर देशमुख हेच सक्षम नेतृत्व आहे. त्यांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केले.
अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ मायणी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख, सरपंच सचिन गुदगे राधिका देशमुख व डॉ. येळगावकरांचे समर्थक उपस्थित होते.
मतदारसंघातील जनतेला काही दृष्ट प्रवृत्तींनी लाचार बनविण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या दहा वर्षांत विकासाचा ठोस अजेंडा राबविल्याचे दिसत नाही. युवा पिढीला वाममार्गाला लावले जात आहे. दोन्ही तालुक्यांचे नुकसान रोखण्यासाठी “आमचं ठरलंय’ ही सर्वपक्षीय आघाडी स्थापन झाली आहे.
त्यामध्ये माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडून प्रभाकर देशमुख यांच्या मागे मतांचा डोंगर उभारून त्यांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले. देशमुख यांना प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने खटाव-माणच्या विकासासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी साहेबांना साथ देऊन सर्वाधिक मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन अनुराधा देशमुख यांनी केले.