सातारा – मोठ्या बतावण्या करून शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्या विरोधकांची या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची कुवतच नसल्याने मतदारांनी त्यांना नाकारल आहे, अशी खोचक टीका आमदार मकरंद पाटील यांनी मदन भोसले यांच्यावर केली. पसरणी (ता. वाई) याठिकाणी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
याप्रसंगी प्रताप पवार, भैय्या डोंगरे, रमेश गायकवाड, मारुती वाडकर, पं.स. सदस्य सुनीता कांबळे, सरपंच नीता जमदाडे, रुपाली घाडगे, धर्माजी शिर्के, मंगेश महांगडे, बाजीराव महांगडे, महेश पुजारी, रवी शिर्के, बापू शिर्के, प्रकाश येवले, मधुकर महांगडे, प्रमोद महांगडे, प्रदीप येवले, धनंजय महांगडे, अमित महांगडे, संजय महांगडे, मयूर चव्हाण, दत्ता भणगे, चंद्रकांत सणस आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हणजे श्रीनिवास पाटील आहेत. 2014 ला मी प्रतापगडसाठी 18 कोटींचा विकास आराखडा मंजूर करून आणला.पण मागील पाच वर्षात शासनाने एक पै सुद्धा प्रतापगडसाठी खर्ची घातली नाही. नागेवाडी धरण मदनआप्पा यांनी बांधले आणि माझ्या कार्यकाळात दोन्ही कॅनॉलची कामे 100 टक्के पूर्ण केली आहेत. मागील 10 वर्षात आपल्या मतदार संघातील तीनही तालुक्यात सर्व नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. पण आपला विरोधक म्हणजेच समोरचा गडी मात्र साडेआठशे कोटी कर्जाच्या बोज्याने वाकलाय. आता या महाशयांनी कारखान्याच तर वाटोळच केलंय आता तो मतदार संघाचे सुध्दा वाटोळे करेल. मोठमोठ्या बतावण्या करून शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्या विरोधकांची या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची कुवतच नसल्याचा घणाघात आमदार मकरंद पाटील यांनी केला.
वाईचा पश्चिम भाग राष्ट्रवादीमय
वाई तालुक्याच्या पश्चिम विभागामध्ये आमदार मकरंद पाटील यांची भव्य रॅली काढण्यात आली. भव्य रॅलीमुळे संपूर्ण पश्चिम विभाग राष्ट्रवादीमय झाला होता. यावेळी शेकडो चारचाकी, दुचाकी वाहने, हजारो पुरुष, महिलांचा सहभाग, रांगोळी, फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो महिलांच्या औक्षणांनी आबांचा विजय निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. धोम, अभेपुरी, वेलंग, आसरे, रेणावळे, वडवली, खावली, जांभळी, वाशिवली, कोंडवलळे, वासोळे, आकुशी, कोंडवली, परतवडी, नांदगणे, बलकवडी, वयगाव, दह्याट, उळुंब, बोरगाव बुद्रुक, बोरगाव खुर्द, धावली, चिखली, धसवडी, एकसर, पसरणीसह सर्व गावामधून ही रॅली काढण्यात आली. आमदार मकरंद पाटील यांचे आगमन होताच प्रत्येक गावामध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. सर्व गावांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी सर्वच कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत होती.