मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर गेला आहे, आता प्रकरणाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. कदाचित त्याच दिवशी घटनापीठावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर सलग सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला निश्चित झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.
न्यायालयाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी,”घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल,14 फेब्रुवारी व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, असे म्हटले आहे. त्याच बरोबर “आमचं राज्यघटनेवर प्रेम आहे, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे. आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.” असेदेखील राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार असून शिवसेनेतील बंडाळी, विधानसभा अध्यक्ष निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
तत्पूर्वी, संजय राऊत यांनी शिवसेना फोडणे हे शरद पवार यांचं स्वप्न नव्हते, तर ते भाजपचे होते. हे राष्ट्रीय धोरण भाजपचे आहे. या कटात ते सामील झाले आहेत. आता राज्यातील घटनाबाह्य सरकारचा मृत्यू ठरलेला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. वेळेत निकाल लागल्यास फेब्रुवारीपर्यंत हे सरकार कोसळेल, असा दावाही राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, कोणत्याही दबावाखाली स्वायत्त संस्था येऊ नये. या देशात न्याय व्यवस्था आहे की नाही हे या केसवरुन दिसून येईल. आम्ही सत्याच्या पलिकडे काहीच मागत नाही. लोकशाहीत कोणते आदर्श निर्माण करणार आहेत हे या प्रकरणातून जगासमोर जाणार आहे. आता सरकार आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करतील, असा दावा त्यांनी केला. आम्ही अधिवेशनात काढलेली प्रकरणे ईडीला दिसत नाहीत का, असा सवाल राऊत यांनी केला.