नायगाव – जगभरात ठाण मांडलेल्या करोनामुळे ग्रामीण भागात झळ बसत आहे. करोनाच्या अफवांमध्ये पोल्ट्री व्यावसायिक भरडला गेला आहे. याच कालावधीत चिकन खाल्ल्याने करोना होतो, अशी अफवा पसरल्यामुळे शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय डबघाईस आला आहे. सध्या चिकनचे दर वाढल्याने पोल्ट्रीधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, तीन महिन्यांतील नुकसानीचा भार व्यावसायिकांच्या मानगुटीवर आहे.
शेतात उत्पादित केलेला तरकारी माल, भाजीपाला व इतर उत्पन्नाला आधारभूत किंमत मिळत नसल्याने पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात वर्षभरात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. युवावर्ग पोल्ट्री व्यवसायाकडे वळला आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची शेतीला व पोल्ट्री व्यवसायाला खऱ्या अर्थाने गती मिळाल्याने नायगाव, राजुरी, पिसर्वे, मावडी, पिंपरी, परिसरात युवकांनी पोल्ट्री व्यवसायात पाय रोवले आहे. करोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
कोंबड्या शेडमध्येच पडून राहिल्या होत्या. बाजारभाव मिळत नसल्याने कंपन्यांकडून खाद्य मिळत नव्हते. याच कालावधीत पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्या फेकून दिल्या होत्या. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
पोल्ट्री व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. चिकनमुळे करोना होतो. या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. तरुणवर्ग या व्यवसायाकडे वळला आहे. काहींनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी.
– संतोष गायकवाड, पोल्ट्री व्यावसायिक, नायगाव.