दिवे – करोनामुळे शेतीची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. त्यामुळे शेतीमालाला उठाव नसल्यामुळे शेतकरी आणखी तीन वर्षे तरी मागे पडला आहे. गेल्या तीन वर्षांपासून दोन वर्षे दुष्काळ, एक वर्षे अवकाळी, आता करोनारूपी लॉकडाऊन शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. देशभरात अंजीर उत्पादनात पुरंदर तालुका अग्रेसर आहे. मात्र, लॉकडाऊनच्या तडाख्यात अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना 4 कोटी 50 लाखांचा फटका बसला आहे.
पुरंदर तालुक्यात फोंड्या माळावर आणि पोषक जमिनीवर अंजीरचा उत्पादन क्षमता सर्वाधिक आहे. त्यामुळे पुरंदरचे अंजीर हे देशातील प्रमुख बाजारपेठेतील मुख्य ओळख बनली आहे. पुरंदर तालुक्यात अंजीर हंगामातील उन्हाळी हंगामात मिठ्ठा हंगाम सुरू आहे. पुरंदर तालुक्यात 500 हेक्टरवर अंजीर उत्पादन घेतले जाते. यात मीठा बहरमध्ये 450 एकर बागा आहेत.
उन्हाळी हंगामात दिवे परिसरात गुऱ्होळी, शिंगापूर, वाघापूर, भिवडी, पिंपळे, सोनोरी, खेड शिवापूर, गोगलवाडी आदी गावात अंजीर उत्पादन घेतले जाते. पुरंदर येथे पिकणाऱ्या अंजीराला पुणे, मुंबई येथील ग्राहकांकडून विशेष मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतात. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण मार्केट बंद झाले आहे. अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही व्यापारी थेट बांधावर येऊन अंजीर खरेदी करीत आहेत.
परंतु व्यापारी वर्गाला सुध्दा पुढे माल विक्रीसाठी अडचण येत आहेत. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात अंजीर व इतर फळे, भाजीपाला विकत आहेत. अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना एकरी साधारण एक लाख रुपये उत्पादन खर्च येतो. सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा मिळणे दुरापास्त झाले आहे.
माझ्या शेतात साधारण दोनशे अंजीराची झाडे आहेत. मी दरवर्षी उन्हाळी हंगामात मिठ्ठा हंगामाचे उत्पादन घेतो. चार पैसे हातात मिळवून देणारे पिक म्हणून अंजीराकडे पाहिले जाते. परंतु यावर्षी करोनामुळे उत्पादन खर्च मिळणे अवघड झाले आहे.
– समीर काळे, अंजीर उत्पादक, काळेवाडी.
पुरंदर तालुक्यात साधारण 500 एकर क्षेत्रावर अंजीर उत्पादन घेतले जाते. अंजीर उत्पादन पावसाळा व उन्हाळा अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. सध्या करोना व्हायरसने तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
-नितीन जाधव, हरे कृष्णा कृषी सेवा केंद्र, दिवे.