पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बटाट्याची लागवड प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यात केली जाते. यंदा मात्र हे चित्र बदलले आहे. तेथे बटाट्याची लागवड सुमारे २० टक्क्यांनी घटली आहे. भविष्यातील तुटवडा लक्षात घेऊन त्या भागात बटाट्याची साठवणूक करण्यास सुरुवात झाली आहे.
या परिस्थितीचा परिणाम बटाट्याच्या दरावर झाला आहे. आठवडाभरात बटाट्याच्या भावात घाऊक बाजारात दहा रुपयांनी वाढ झाली असून यंदा वर्षभर बटाट्याचे भाव चढेच राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
बटाट्याची सर्वाधिक लागवड उत्तर प्रदेश येथे होते. त्याखालोखाल पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतही बटाट्याचे पीक घेतले जाते. उत्तरेकडील राज्यांतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बटाट्याची आवक होते. बटाट्याचा हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होतो. चार ते पाच महिने नवीन बटाट्याचा हंगाम सुरू राहतो. यंदा उत्तर प्रदेशात बटाट्याच्या लागवडीत २० टक्क्यांनी घट झाली आहे.
नवीन बटाट्याचा हंगाम जवळपास संपला असून, सध्या बाजारात बटाट्याची आवक कमी प्रमाणावर होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील बटाटा व्यापारी राजेंद्र तथा अप्पा कोरपे यांनी दिली.
उत्तर प्रदेशासह मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांनी बटाटा साठवणुकीस सुरुवात केली आहे. हंगाम संपल्यानंतर वर्षभरासाठी लागणाऱ्या बटाट्याची साठवणूक शीतगृहात केली जाते. सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बटाट्याची साठवणूक सुरू केली आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात बटाट्याची मोठी बाजारपेठ असून, गेल्या आठवड्यापासून बटाट्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. घाऊक बाजारात एक किलो बटाट्याला प्रतवारीनुसार २३ ते २६ रुपये भाव मिळत आहेत, तर ३५ ते ४० रुपये भावाने किरकोळ बाजारात् विक्री होत आहे.
स्थानिक भागात बटाट्याचे उत्पन्न होते. मात्र, त्यातून संपूर्ण राज्याची भागत नाही. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या बटाट्यावर आपल्याला अवलंबून राहावे लागते. तेथेच यंदा कमी लागवड झाली आहे. त्यामुळे या वर्षी बटाट्याचे भाव वर्षभर चढेच राहतील.- राजेंद्र कोरपे बटाटा व्यापारी, मार्केट यार्ड