पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील हजारो एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड केली आहे. सध्या प्रत्येकाच्या शेतात बटाटा काढणीच्या कामांना वेग आला आहे.
सातगाव पठार पावसाळी बटाट्याचे आगार समजले जाते. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे थांबलेली बटाटा काढणी आता वाफसा मिळताच पुन्हा सुरू झाली आहे. जुन्नर, संगमनेर, खेड, मावळ तालुक्यातील आदिवासी भागातील शेकडो मजूर या भागात दाखल झाले असून मजुरांच्या गर्दीने हा भाग फुलून गेला आहे.
सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 20 ते 25 मजूर सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यत बटाटा काढणीचे काम करीत आहेत. सध्या 190 ते 200 रुपये प्रति 10 किलोस बाजारभाव मिळत आहे. मात्र, मजुरांची टंचाई जाणवत असल्याने आदिवासी भागातून मजुरांच्या टोळ्या येथे दाखल झाल्या आहेत. बटाटा काढणीच्या काळात अनेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुले सुद्धा बटाटा काढणीच्या कामासाठी मदत करताना दिसत आहेत. स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे बाहेर गावातून आलेल्या मजुरांची चांगलीच बडदास्त शेतकऱ्यांकडून ठेवली जात आहे.
या मजुरांच्या मुक्कामासह जेवन, नाष्ठा व चहा या प्रमाणेच सुमारे 300 रुपये प्रती मजुरास रोज द्यावा लागत आहेत. तसेच संपूर्ण बटाटे ज्या मालकाचे काढून होतील त्यांच्याकडून किमान एक ते दोन घमेले बटाटे मजुरांना द्यावे लागतात. मजुरांना मजुरीपोटी एका एकरासाठी 6 ते 7 हजार रुपये खर्च करावा लागत आहे.