हुतात्मा राजगुरूनगर महाविद्यालायातील विद्यार्थ्यांनी राळेगणसिद्धि येथे घेतली भेट
राजगुरूनगर- विद्यार्थ्यांनी शुद्ध आचार, विचार व निष्कलंक जीवन जगताना विचारांना कृतीची जोड द्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
पर्यटनदिनानिमित्त हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. विद्यार्थ्यांनी राळेगण सिद्धी, निघोज कुंड येथे भेट दिली. यात तृतीय वर्षातील सुमारे 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पाणलोटक्षेत्र विकास व भौगोलिक भू दृष्यांचे निरीक्षण करणे असा या क्षेत्र भेटीचा उद्देश होता. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीतील ग्रासस्थ शाश्वत ग्रामविकासामुळे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे सांगितले.
भौतिक विकासाबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैली महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा विनियोग ग्रामविकासात विधायक भूमिका घेण्यात करावा असे आवाहन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या अभ्यास भेटीत विद्यार्थ्यांनी नापासांची शाळा, वसतिगृह, मीडिया सेंटर, हिंद स्वराज्य संस्था या स्थळांना भेटी दिल्यावर सलग समतल पातळी चर, नाला बडींग, पाझर तलाव, गॅबीयन बंधारे, कंपार्टमेंट बंडींग तसेच सामाजिक वनीकरण अशी पाणलोट क्षेत्र विकासाच्या विविध प्रकाराची माहिती करून घेतली. गावामध्ये सार्वजनिक श्रमदानाबरोबर दारूबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदीचा वापर करून गावाचा झालेला कायापालट विद्यार्थ्यांनी समजून घेतला. याशिवाय पारनेर तालुक्यातील निघोज गावाजवळील कुकडी नदीपात्रातील रांजणखळग्यांचा अभ्यास केला. राळेगणसिद्धीपासून प्रेरणा घेऊन आपापल्या गावात काम करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. या भौगोलिक अभ्यास सहलीचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख प्रा. दिलीप मुळूक, प्रा. डी. एम. मारकड, प्रा. मच्छिंद्र मुळूक यांनी केले.