नवी दिल्ली- लॉक डाऊनच्या काळात भारतीय पोस्ट विभागाने 2018 औषधे आणि वैद्यकीय साहित्य विविध ठिकाणी उपलब्ध केले. या पुरवठा साखळीचा उपयोग करून आगामी काळात पोस्ट विभाग आपला व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, लॉक डाऊनच्या काळात पोस्टाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. आगामी काळात औषधे, कृषी उत्पादने इत्यादी उत्पादकापासून थेट ग्राहकांना पुरविण्याच्या शक्यतेवर पोस्ट विभाग काम करीत आहे. त्याचबरोबर आगामी काळात स्थलांतरित मजुरांना त्यांची बॅंक खाते उघडणे, त्यांची नोंदणी करणे, त्यांना रोजगार हमीअंतर्गत काम उपलब्ध करण्यासाठी मदत करणे इत्यादी काम हाती घेण्यात येणार आहे.
पुरवठासाखळीचा भाग म्हणून जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिराचा प्रसाद आणि केशर देशभर पुरविण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. पोस्टमध्ये प्रचंड क्षमता आहे या क्षमतेचा वापर करून आगामी काळात पोस्ट आपली उलाढाल वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.