मुंबई – रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेस नेते किशोर गजभिये हे नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे पक्षाकडून अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यावर देखील गजभिये उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहे. त्यामुळे रामटेकमध्ये काँग्रेस पक्षातून बंडखोरी होते की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रामटेकमध्ये माझ्या ऐवजी रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली गेल्याने माझ्यावर अन्याय झाला असल्याची भूमिका किशोर गजभिये यांनी बोलून दाखवली आहे. रामटेकमधून पात्र उमेदवाराला उमेदवारी दिली गेली नसल्यामुळे बौद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो, मी उद्या रामटेकमधून माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार असे किशोर गजभिये म्हणाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील पहिली बंडखोरी ठरणार आहे.
गजभिये म्हणाले की, रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्राच्या वादामुळे रद्द होण्याची दाट शक्यता असून, पक्षाने पहिला ए.बी फॉर्म रश्मी बर्वे यांना द्यावा. मात्र, दुसरा ए.बी फॉर्म मला द्यावा.
रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर किमान माझ्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार रामटेकच्या मैदानात राहील, असा तर्क त्यांनी मांडला आहे. त्यामुळे आता पक्षाकडून याबाबत काय भूमिका घेण्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.