मुंबई – कांदा उत्पादन करणाऱ्या राज्यात पाऊस अनियमीत पडला असल्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे आक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान कांद्याचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्रिसील या संशोधन करणाऱ्या संस्थेने याबाबत माहीती जारी केली आहे. या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, एक तर कांद्याचा साठा फार कमी आहे. त्याचबरोबर खरीपाचे पिक बाजारात उशीरा येणार आहे. त्यामुळे कांद्याच्या किमतीवर दबाव येणार आहे. या वर्षी 2018 प्रमाणेच कांद्याचे दर किमान 100 टक्क्यांनी वाढणार आहेत. महाराष्ट्रातून कांद्याचे उत्पादन कमी होणार असल्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर 30 रु. प्रति किलोक्षा जास्त होण्याची शक्यता वाढली आहे.
ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा लावला जातो. मात्र याच महिन्याता कांद्याचे उतपादन घेणाऱ्या राज्यात पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे कांद्याच्या लागवडीवर बराच परिणाम झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 9 टक्के इतका कमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी कमी उत्पादनाबरोबरच वाहतूकीत अडथळे निर्माण झाल्यामुळे कांद्याचे दर उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढून कांद्याची आयात करावी लागली होती. आता परिस्थिती इतकी खराब होणार नाही. मात्र कांद्याचे दर काही प्रमाणात वाढणार आहेत. या वर्षी वाहतूकीत फारसे अडथळे येणार नाहीत.
भारताला दर महिन्याला 13 लाख टन इतका कांदा लागतो. त्यासाठी कांद्याचे उत्पादन तीन वेळा घेतले जाते. रब्बीत कांद्याचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या 70 टक्के इतक घेतले जात असले तरी खरीपातील कांदा हा किंमतीच्या संतुलनाच्या दृष्टीकोणातून महत्वाचा असतो. या हंगामात कांद्याचे उत्पादन कमी झाले की किंवा वाहतूकीत अडथळे निर्माण झाले की उत्सवाच्या काळात कांद्याचे दर वाढतात.
कारण या काळात कांद्याचा वापर वाढतो. महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या 35 टक्के इतके होते. आता महाराष्ट्रतील कांदा उशिरा येण्याची शक्यता वाढली असल्यामुळे उत्सवाच्या काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारला याची कल्पना आहे. त्यामुळे सरकारने 2 लाख टन कांद्याचा साठा करून ठेवला आहे. त्याचबरोबर आयात वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.