नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशात उद्योगासाठी सुलभ वातावरण निर्माण करण्याची मोहीम चालू ठेवली आहे. फोर्ड या अमेरिकन कंपनीने भारतातील दोन प्रकल्प बंद करण्याचे ठरविले आहे. त्याचा देशातील उद्योगासाठी सुलभ वातावरणाशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण सरकारकडून करण्यात आले आहे.
सरकारी सूत्रांनी याबाबत सांगितले की, वाहन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जपान आणि कोरियाच्या कंपन्या या क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्या स्पर्धेचा इतर कंपन्यावर परिणाम होत आहे. त्याचाच भाग म्हणून काही मोटार कंपन्या आपल्या उत्पादनात कपात करीत आहेत किंवा उत्पादन बंद करीत आहेत.
भारत हा वाहन उत्पादन करणाऱ्या प्रमुख देशांपैकी आहे. त्याचबरोबर आगामी काळात भारतातील वाहनाचे उत्पादन वाढत राहणार आहे. भारतामध्ये केवळ देशांतर्गत गरजासाठीच उत्पादन केले जात नाही तर निर्यातीसाठीही उत्पादन केले जाते. फोर्ड कंपनीसमोर इतर काही अडचणी असू शकतात. त्यामुळे त्या कंपनीने उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील उद्योगविषयक वातावरण चांगले आहे.
त्यामुळे गेल्या सहा वर्षात भारतामध्ये 35 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे असे सूत्रांनी सांगितले. याअगोदर अमेरिकेतील जनरल मोटर्स कंपनीने भारतातील उत्पादन बंद केले आहे. 2019-20 मध्ये भारतामध्ये 10.91 लाख कार विकल्या गेल्या होत्या. त्या तुलनेमध्ये एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान भारतात 11.42 लाख कार विकल्या गेल्या आहेत.