बेंगळूरु – अंतराळात मानव पाठवण्याची भारताची महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेला करोनाच्या साथीमुळे वर्षभर विलंब होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
“गगनयान’ मोहिमेंतर्गत अंतराळ मोहिमेवर मानव पाठवण्यापूर्वी दोन मानव मोहिमा केल्या जाणार आहेत. या मानवविरहीत मोहिमांपैकी पहिली मोहीम डिसेंबर 2020 मध्ये आणि दुसरी मोहीम जुलै 2021 मध्ये होणे अपेक्षित होते. यानंतर मानवाला अंतराळात पाठवण्याची पहिली मोहीम डिसेंबर 2021 मध्ये करण्याचे नियोजन होते.
मात्र आता कोविड-19 च्या साथीमुळे या मोहिमेच्या वेळापत्रकाला विलंब होण्याची शक्यता आहे, असे “इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. नवीन वेळापत्रकानुसार पहिल्या दोन मानवविरहीत मोहिमा पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा त्यानंतरच्या वर्षात होतील, असे ते म्हणाले.
“गगनयान’ मोहीम ही पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या कक्षेमध्ये होणार आहे. तीन सदस्यांच्या चमूला अवकाशात पाठवून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षितपणे आणण्याची ही मोहीम असेल. “गगनयान’साठी जीएसएलव्ही एमके-3 ची निवड केली गेली आहे. या रॉकेटच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत, असे “इस्रो’ने गेल्या महिन्यातच सांगितले होते.
लॅंडर आणि रोव्हर यांचा समावेश असलेल्या “चंद्रयान-3′ मोहिमेचे कार्य देखील प्रगतीपथावर आहे, असे सिवन म्हणाले. मात्र “चांद्रयान-3’साठीचे वेळापत्रक अद्याप निश्चित झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.