मंडी (हिमाचल प्रदेश) – ते दोघेही उच्चशिक्षित, एमबीए झालेले. चांगली नोकरी करणारे, करोनाच्या काळात नोकरी गेल्यानंतर दोघांनी गावाकडे परत येऊन दूध उत्पादनाला उपजिविकेचे साधन बनवले आणि आज त्यांच्या गोठ्यातून रोज 100 ते 150 लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यांच्या गोठ्यात देशी जातीच्या 54 गायी आहेत. मौफर्स कंपनीच्या नावाने ते दिल्ली आणि मुंबईपर्यंत दूध पाठवतात. मंडी जिल्ह्यातील सरकाघाट तालुक्यातील हवानी गावचे मनजीत शर्मा आणि उपासना शर्मा हे दांपत्य दिल्लीत रहात होते. मनजीत एका टुर अँड ट्रॅव्हल्स कंपनीत नोकरी करत होता तर उपासन खासगी कंपनीत एचआर विभागात नोकरीला होती.
करोनाच्या काळात मनजीत यांना मिळणारा पगार बंद झाला. मग त्यांनी दिल्लीत थांबण्याऐवजी गावी येऊन डेअरीवर काम सुरु केले. आता ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला असून ते व्यवसाय वाढवण्यासाठी उत्साहाने कामाला लागले आहेत. उपासना सांगतात की, दिल्लीमध्ये देशी गायीचे दूध आणि अन्य दुध उत्पादनांना मोठी मागणी आहे. करोना काळातील अडचणींमुळे आम्ही दोघांनी गावी येऊन दूध उत्पादनांत उतरण्याचा निर्णय घेतला.
आधी सासू-सासऱ्यांकडे काही गायी होत्याच. मग आम्ही आणखी देशी जातीच्या गायी आणल्या. आता थारपारक, साहिवाल, राठी, गीर, पहाडी, चौलीस्थानी या देशी जातीच्या गायी आमच्य गोठ्यात आहेत. या कामात सासू-सासऱ्यांची मोठी मदत मिळते. त्यामुळे शेणापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्यासाठी प्लँट सुरू केला आहे. दुधासाठी चिलिंग प्लँटचे काम सुरू आहे. देशी गायीच्या दुधाला दिल्ली आणि मुंबईत अधिक मागणी आहे. 60 ते 65 रुपये लिटरने ते विकले जाते.
त्याचबरोबर देशी गायीच्या दुधाचे तूप 1700 ते 2500 रुपये किलो या भावाने विकले जाते. शर्मा यांच्या गोठ्यात देशी गायीच्या दुधाचा दर 60 रुपये आहे तर घरी पोचवण्यासाठी 65 रुपये लिटर असा आहे. त्याखेरीज दही, लस्सी, पनीर अशी उत्पादने दुधापासून तयार करून ती देखील विकली जातात.