पुणे – यंदा राज्याच्या विविध भागातील दुष्काळी परिस्थितीचा फटका डाळिंब उत्पादनाला बसला आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत मार्केटयार्ड फळबाजारात निम्मी आवक घटली आहे. डाळिंबाला गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त भाव मिळत आहे.
सध्या घाऊक बाजारात डाळिंबास किलोस दर्जानुसार 10 ते 200 रुपये प्रती किलो भाव मिळत आहे. तर, गेल्यावर्षी चांगल्या उत्पादनामुळे आवक वाढून डाळिंबाचे किलोचे भाव 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत होते.
जिल्ह्यासह राज्यात गेल्या चार-पाच वर्षांत डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मागील उत्पादनात वाढ होऊन डाळिंबाच्या भाव घसरले होते. मात्र, यंदा राज्यातील विविध भागातील दुष्काळ परिस्थितीमुळे डाळिंबाच्या बागांना पाणी कमी पडून उत्पादनात घट झाली. शेतकऱ्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवूनही आवश्यक तितक्या प्रमाणात पाणी न मिळाल्याने डाळिंब बागांना फळधारणा कमी प्रमाणात झाली. तर, काही भागातील डाळिंब बागा पाण्याअभावी हातून गेल्या आहेत. त्यामुळे बाजारातही आवक घटून डाळिंबाच्या भावात वाढ झाली आहे, अशी माहिती डाळिंबाचे आडते बापू अरूण भोसले यांनी दिली.
भोसले म्हणाले, “अलीकडच्या काळात डाळिंबाचा हंगाम तसा वर्षभर सुरू असला तरी जुन ते ऑगस्ट कालावधीत हंगाम बहरण्यास सुरूवात होते. सोलापुर, नगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही भागातून आवक होते. गेल्यावर्षी डाळिंबाची बाजारात सुमारे 12 ते 15 हजार क्रेटस इतकी आवक होत होती. सध्या ती आवक 5 ते 6 हजार क्रेट्स इतकी खाली आली आहे.’ नवरात्रोत्सवात डाळिंबांना मागणी वाढून भावात वाढ होण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.