इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त
पळसदेव- श्रावण महिन्यात उपवास असल्यामुळे डाळिंबाला चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात टॅंकरने तसेच दोन दोन विदुत पंप जोडून फळबागा जगवलेल्या शेतकऱ्यांचे कष्टाचे चीज झाले आहे. त्यामुळे पाण्याअभावी इंदापूर तालुका होरपळत असताना शेतकऱ्यांना बाजारभावाने तारले आहे. सध्या डाळिंबाला 60 ते 100 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात पळसदेव, भावडी, लोणी देवकर, निमगाव केतकी, कळस भागात डाळिंब चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे वर्षभर राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारला जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रात्री डाळिंबाची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
पळसदेव भागात तर भुरट्या चोऱ्या अधिक वाढल्या आहेत. एकतर बागा जगवण्यासाठी रात्रीचा दिवस करून ऐन उन्हाळ्यात डोळ्यात तेल घालून जागून बागा जगविल्या आहे. आता फळ मिळण्यावेळी परत त्याच बागांची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चोरट्यांनी बागेतील मोठी डाळिंबे तोडून नेली आहेत. रात्रीच्या वेळी चार ते पाच जणांच्या टोळक्यांकडून चोऱ्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. डाळिंबाच्या चोरीबरोबर पाईप, केबल, विद्युतपंप आदी साहित्यांची चोरी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे उजनी भागातील शेतकरी पुरता बेजार झाला आहे. डाळिंबाला अधिक भाव मिळत असल्याने डाळिंबाची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.