गायरानात जागा नावे केव्हा होणार : गोरगरीब चिंतेत
नीरा नरसिंहपूर- तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे गावठाण कमी आणि लोकसंख्या जास्त आहे. निम्मे गाव पूररेषेमध्ये आहे. त्यामुळे येथील नागरिक हे गायरान क्षेत्र गट नंबर दोन व तीनमध्ये वास्तव्य करीत आहेत. गेल्या दहा ते वीस वर्षांपासून गायरान क्षेत्रांमध्ये लोक राहत आहेत. ग्रामपंचायतीने 2016 रोजी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय बारामती, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गावठाण हद्दवाढीसंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रस्ताव तयार करून पाठवला होता. तरीही शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहत आहेत.
नीरा नरसिंहपूर गाव पूररेषेखाली येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्या गायरानात लोकवस्ती आहे. त्या गायरानातील जागेचा उतारा नागरिकांच्या नावे करून मिळावा, या उद्देशाने वेळोवेळी शासकीय अधिकारी, आमदार दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना गावठाण हद्दवाढीबाबत मागणी केली होती. तरीही कार्यवाही झाली नाही. नागरिकांना त्यांच्या मालकीचे हक्काचे उतारे मिळत नाहीत. गायरान क्षेत्रांमध्ये गोरगरीब, कष्टकरी मजूर आहेत. त्यांना त्यांच्या घराचे कायमस्वरूपी रहिवासी, असे उतारे मिळावेत, अशी मागणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीची आहे. गावठाण हद्दवाढीचा ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, इंदापूर पंचायत समिती, तहसील कार्यालय, आमदार भरणे यांच्याकडे दि. 4 फेब्रुवारी 2016 रोजी ठराव दाखल केला आहे. तरीही प्रशासन ढिम्म बनले आहे.