देहूगाव – नवरात्र उत्सवाला उद्यापासून (रविवार ) प्रारंभ होत आहे. पितृपंधरवडा संपुष्टात येताना परिसरातील नागरिक देहूतील इंद्रायणी नदी घाटावर गोधड्या धुण्यासाठी येतात. रंगबिरंगी गोधड्या, ब्लॅंकेट, चादर व इतर कपडे धुवून कपडे वाळत घातल्याने नदी परिसराला रंगबिरंगी रूप आले आहे. तर इंद्रायणीनदीच्या होत असलेल्या प्रदुषणाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
घटस्थापना ते दसरा दरम्यान शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीत देवीचा जागर,भजन, कीर्तन, धार्मिक विधी होत असल्याने तत्पूर्वी सुरू असलेल्या पितृपंधरवड्यामुळे घराची रंगरंगोटी व साफसफाई करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे.
इंद्रायणी नदी पात्रात वाहत असणारे पाणी आणि विस्तीर्ण असा घाट परिसर असल्यामुळे नागरिकांनी इंद्रायणी घाटावर गोधड्या अंथरूण पांघरूण कपडे धुण्यासाठी गेल्या आठवड्याभरात गर्दी केल्याची दिसून येत आहे. दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांमधून या कपड्यांची वाहतूक केली जात आहे.
कपडे धुऊन झाल्यानंतर घाट परिसरात तर चक्क इंद्राणीच्या पुलावरील दुतर्फा लोखंडी कठड्यांवर वाळण्यासाठी घातल्याने परिसराला ओंगळवाणे रुप आले आहे.