Delhi Pollution – दिल्लीत दोन दिवसांत प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. रविवारी सकाळी 7 वाजता शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 290 इतका होता. तर शनिवारी 319, शुक्रवारी 405 आणि गुरुवारी 419 एक्यूआयची नोंद झाली होती.
प्रदूषण कमी होत असल्याचे पाहून ग्रॅप-4 (ग्रेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन) 14 दिवसांनी दिल्लीतून हटवण्यात आला आहे. वाढते प्रदूषण पाहता 5 नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. याचाच अर्थ असा की आता शहरांमधील बांधकाम आणि ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली आहे.
दुसरीकडे, दिल्लीत सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होत आहेत. प्रदूषणामुळे सरकारने 8 नोव्हेंबर रोजी शाळांना 10 दिवसांची हिवाळी सुट्टी जाहीर केली होती. दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी कमी झाल्याचे पाहून दिल्लीचे पर्यावरण मंत्री आणि आप नेते गोपाल राय म्हणाले, गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सुधारली आहे. त्यामुळे ग्रॅप-4 निर्बंध हटवण्यात आले आहेत.
परंतु मी दिल्लीकरांना सतर्क राहण्याची विनंती करतो. ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली आहे, बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल वाहनांवरील बंदी अजूनही लागू आहे. दिवाळीपूर्वी पावसाने दिलासा दिला होता. पण सणासुदीच्या दिवशी लोकांनी पुन्हा फटाके फोडून हवा खराब केली. मात्र, आता हवेत थोडी सुधारणा झाली आहे. या दरम्यान सर्वांनीच खबरदारी घ्यावी.
मॉर्निंग वॉक-व्यायाम टाळावा
दिवाळीनंतर प्रदूषणात वाढ झाल्यामुळे दिल्ली सरकारने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे आणि शारीरिक व्यायाम टाळण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली आरोग्य विभागाने 11 नोव्हेंबर रोजी एक ऍडव्हायजरी जारी केली होती. यामध्ये लोकांना फटाके न फोडण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवाय लोकांना डासांपासून बचाव करणारी कॉइल किंवा अगरबत्ती जाळू नये, असेही सांगण्यात आले होते. सध्या, दिल्ली सरकारने ऑड-इव्हन योजनेवर बंदी घातली आहे, जी दिल्लीत दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत लागू होणार होती.