महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आहे, असे आता म्हटले जात असले तरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षासाठी नक्की कोणती विचारधारा पक्की केली आहे याविषयी संभ्रम आहे.
पक्षाच्या नावातच महाराष्ट्र असल्याने मराठी हा या पक्षाचा मुख्य मुद्दा असायला हवा, असा कोणाचाही कयास असल्यास तो वावगा नाही. मात्र शिवसेनेपासून फारकत घेतल्यावर मराठी मतदार आपल्या मागे येतील असा जो राज ठाकरे यांचा होरा होता तो फारसा बरोबर ठरलेला नाही. किंबहुना शिवसेनेने मराठीच्या मुद्द्याकडून हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच प्रयाण केले आणि आता तर गुजराथी आदी समाजांना आकृष्ट करण्यासाठी शिवसेना आसुसलेली आहे. तेव्हा खरे तर मराठी मतदारांची मतपेढी मिळविण्यासाठी अवकाश मोकळे आहे. मात्र, मराठी पाट्या आणि उत्सवी खळखट्याक यापलीकडे मनसे गेली नाही. किंबहुना मनसेला संधी असूनदेखील राज ठाकरे यांनी तिचा लाभ उठविला नाही. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे प्रासंगिक उपस्थिती लावून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न करतात. राज ठाकरे यांनाही त्याच दोषाचे धनी व्हावे लागेल. जेव्हा नेतृत्वच प्रासंगिक आणि उत्सवी असते तेव्हा मतदार त्याकडे सक्षम पर्याय म्हणून पाहात नाहीत.
त्याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने दिल्लीपाठोपाठ पंजाबही काबीज केले आहे आणि आता गुजरात आणि हिमाचल प्रदेश यावर आपने लक्ष केंद्रित केले आहे, हे लक्षवेधी ठरते. त्यासाठी स्वतः केजरीवाल यांच्यापासून आपचे नेते आणि कार्यकर्ते मेहनत घेत असतात. मनसेपाशी करिश्मा असणारे नेतृत्व आहे हे खरे; पण नेतृत्वामागे संघटन आणि व्यूहनीती यांचे पाठबळ नसेल तर पक्षाची वाटचाल ही आश्वासकतेकडून निराशाजनकतेकडे होऊ लागते. मनसेला आपला मार्ग कोणता हे अद्यापि ठरविता येत नाही यातच गांभीर्याच्या अभावाचे दर्शन घडते.
मनसेची स्थापना झाल्यानंतर काही काळ त्या पक्षाला प्रकाशझोत अवश्य मिळाला. मुंबई, नाशिक अशा मोजक्या ठिकाणी का होईना पण पक्षाला काही जागा मिळाल्या आणि त्या पक्षाविषयी मतदारांत कुतूहल आणि अपेक्षा आहेत याचे प्रतिबिंब त्यात पडले होते. नाशिकमध्ये तर मनसेला सत्ता मिळाली होती. मात्र सत्ता आणि तीही पहिल्यांदाच मिळाल्यावर एक तर काही कामगिरी करून दाखवावी लागते आणि सत्ता नसेल तरी आपल्या संघटनात्मक कार्यात सातत्य ठेवावे लागते. या दोन्ही आघाड्यांवर मनसे असफल ठरली. ब्ल्यू प्रिंट इत्यादी नावे दिल्याने काही काळ प्रसिद्धी मिळते; मात्र जेव्हा त्याच ब्ल्यू प्रिंटच्या पूर्तीची झाडाझडती सुरू होते तेव्हा मग उत्तरदायी व्हावे लागते. संघटनेत चैतन्य हे केवळ भाषणे करून निर्माण करता येत नाही. त्यासाठी नेते, नेतृत्वाची दुसरी फळी, कार्यकर्ते यांची वीण पक्की लागते. भाषणांनी गर्दीचे मनोरंजन अवश्य करता येते; पण एकदा त्याचीच चटक लागली की मग तोच पायंडा पडतो.
कार्यकर्ते पक्षासाठी आपले सर्वस्व देत असतात. मग तो कोणताही पक्ष असो; त्या सगळ्यांनाच सत्तास्थाने हवी असतात असे नाही; ज्यांना हवी असतात ते पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला सोयीस्कर रामराम ठोकून मोकळे होतात. मात्र, कित्येक जण पक्षासाठी खरोखरच निरपेक्षपणे काम करीत असतात. अशांना आपल्या नेत्याने आपल्या निर्णयांनी धक्के देणे हे शहाणपणाचे नव्हे. अचानक कोणतीतरी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घ्यायचा; अचानक कधी मोदींच्या गुजरात मॉडेलचे तोंडभरून कौतुक करायचे; अचानक कधी भाजपला लक्ष्य करून “लाव रे तो व्हिडियो’चे प्रयोग करायचे, अचानक कधी शरद पवार यांची मुलाखत घ्यायची, अचानक कधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे महाराष्ट्रात जातीयवाद वाढला म्हणून टीका करायची, अचानक कधी नितीन गडकरी यांची भेट घ्यायची आणि अचानक कधी हिंदुत्वाचा नारा देऊन हनुमान चालीसाच्या भोंग्यांनी मशिदींवरील भोंग्यांना उत्तर द्यायचे आदेश द्यायचे… अशाने मतदार आणि सामान्य जनता संभ्रमित होते हा तुलनेने कमी धोका, मात्र या कोलांटउड्यांनी कार्यकर्ते संभ्रमित होतात हा मोठा धोका. कार्यकर्ते हा पक्षाचा कणा असतात आणि त्यांना केवळ बालकथेतील “पाइड पाइपर’ प्रमाणे आपल्या धुनीवर नाचवत ठेवायचे हा दीर्घकालीन पक्षहिताचा मार्ग निश्चितच नव्हे. असे होऊनही कार्यकर्त्यांनी निरलसपणे पक्षाचे काम करीत राहावे आणि सतत मतदारांसमोर नवनव्या भूमिका मांडत राहाव्यात, अशी अपेक्षा करणे चूकच.
मुंबईतील भाषणात राज ठाकरे यांनी आपल्याला “आरे’ला “कारे’ करणाऱ्यांचे नेतृत्व करायला आवडते असे एक मजेशीर वक्तव्य केले. सामान्यतः नेतृत्व कार्यकर्ते आणि पक्ष संघटन घडवीत असते आणि मग त्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावे लागते. पण तयार कार्यकर्ते आणि समाज मिळाल्यावर आपण त्याचे नेतृत्व करू, अशी राज ठाकरे यांची अजब अपेक्षा दिसते. 2019 नंतरच्या अनेक राजकीय घडामोडींचे स्मरण राज यांनी उपस्थित जनसमुदायाला करून दिले. जनतेची सामुदायिक स्मरणशक्ती अल्प असते असा त्यांचा त्यामागील युक्तिवाद. मात्र, आपण पक्ष स्थापनेपासून कितीवेळा भूमिका बदलल्या आहेत याचे स्मरण जनतेला नसावे असा बहुधा त्यांचा कयास असावा. पण जनतेची स्मरणशक्ती इतकी अल्प नसते आणि समाजाची आकलनशक्ती देखील कमकुवत नसते.
सुमारे दोन वर्षांच्या आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांत मतदारांनी कॉंग्रेसला धडा शिकविला होता. तेव्हा प्रश्न तो नाही, प्रश्न सोयीस्कर स्मरणशक्तीचा आहे. राज यांनी आता भाजपशी सलगी करण्याचे संकेतही दिले आहेत. मात्र, विद्यमान भाजप नेतृत्वाची व्यूहनीती ही प्रादेशिक पक्षांशी सलगी, त्यातून आपल्या पक्षाचा विस्तार आणि मग त्याच प्रादेशिक पक्षाचे खच्चीकरण अशी असल्याने मनसे महानगरपालिका निवडणुकांमध्ये का होईना भाजपच्या वळचणीला गेली तर मनसेचे आहे तेही अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही. शिवाय भाजप हिंदुत्वाचा प्रचार करीत असताना आणि अन्य पक्षांना सौम्य का होईना पण हिंदुत्वाच्या मार्गावर येण्यास भाग पाडत असताना मनसेने हिंदुत्वाची राजकीय कास धरल्याने विशेष लाभ काय, हाही सवाल उपस्थित होतो.
एकूण, मनसेच्या स्थापनेला सोळा वर्षे झाली तरी पक्षाला अद्यापि सूर सापडलेला नाही. राज ठाकरे यांचे पिता संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेल्या एका गीताचे शब्द, “नरात शोधी तू नारायण, मिळण्याआधी असते वणवण’ अशी पंक्ती आहे. जनतेतून आपल्या पक्षाशी बांधील मतदार शोधायचे तर भाषणे, आदेश, नकला हे सगळे पूरक झाले. पण भूमिका सातत्य आणि वणवणीला म्हणजेच मेहनत. या मूलभूत गोष्टींना पर्याय नसतो.
राहुल गोखले