राहुल गोखले
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला रोखण्यात येणाऱ्या अपयशास कॉंग्रेसला जबाबदार धरले आहे.
लोकसभेच्या दोन सलग निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या सुमार कामगिरीने लोकांचे मनोधैर्य खचले, असा आरोप बॅनर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या मुखपत्रात लिहिलेल्या स्तंभातून केला तर गोव्याच्या दौऱ्यावर असताना बॅनर्जी यांनी कॉंग्रेस राजकारणाकडे गांभीर्याने पाहात नसल्याने भाजपचे फावते अशी टीका केली. वास्तविक काहीच महिन्यांपूर्वी बॅनर्जी यांनी दिल्लीत सोनिया व राहुल गांधी यांची भेट घेऊन विरोधकांच्या ऐक्याचे चित्र निर्माण केले होते.
तथापि, आता मात्र थेट कॉंग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून भाजपच्या विस्ताराचे खापर कॉंग्रेसच्या कामगिरीशून्यतेवर फोडून बॅनर्जी मोकळ्या झाल्या आहेत. व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांची काहीच महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांच्याशी झालेली भेट चर्चेचा विषय ठरली होती आणि किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेशही करू शकतात अशा वावड्या उठल्या होत्या. तथापि, त्यांनीही मोदींची सत्ता आता कधीही लयाला जाऊ शकते या भ्रमात राहुल गांधी असावेत अशी टीका केली आहे.
अर्थात, ममता बॅनर्जी यांच्या मतप्रदर्शनावर कॉंग्रेसमधून काही सूर उमटले असले तरीही कॉंग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, कॉंग्रेसची उणीदुणी अशी जाहीरपणे काढून ममता बॅनर्जी तरी नक्की काय साधू इच्छितात हाही प्रश्न आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात कॉंग्रेसवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने ममता बॅनर्जी व्यापक चित्राकडे कानाडोळा करीत असतील तर ते भाजपसाठी लाभदायी आणि विरोधकांसाठी हानिकारक ठरेल यात शंका नाही.
काहीच महिन्यांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून असो किंवा पेगॅसस हेरगिरी मुद्द्यावरून असो; भाजपविरोधकांनी संसदेत बऱ्याच काळानंतर ऐक्याचे दर्शन घडविले होते. परिणामतः भाजपला देखील संसदेत काही प्रमाणात बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता. तेव्हा राहुल गांधी सक्रिय झाले होते आणि त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कॉंग्रेसपासून ममता यांच्या तृणमूलने काहीसे अंतर ठेवले होते हे खरे; पण आता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसवर थेट शरसंधान केले आहे.
त्यांनी केलेली टिप्पणी पूर्णपणे गैरलागू आहे, असे नाही. कॉंग्रेस राजकारणात गांभीर्याने लक्ष घालत नाही हे खरेच आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या तिन्ही आणि लोकसभेच्या एका जागेवर कॉंग्रेसने बाजी मारली. महाराष्ट्रातील देगलूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत देखील कॉंग्रेस विजयी झाली आणि कर्नाटकात एका जागेवर कॉंग्रेसने विजयच मिळविला असे नाही तर नुकतीच मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळलेले बोम्मई यांच्या कार्यक्षेत्रात हे यश संपादन केले. दुसऱ्या जागेवर कॉंग्रेसला विजय मिळविता आला नाही तरी गेल्या वेळी तिसऱ्या स्थानावर असणारी कॉंग्रेस यंदा दुसऱ्या स्थानावर आली.
राजस्थानात कॉंग्रेसने एक जागा राखली तर दुसरी जागा भाजपकडून खेचून आणली. हे निकाल पोटनिवडणुकीचे असले आणि फारशा राजकीय स्थित्यंतराची ग्वाही देणारे नसले तरी कॉंग्रेससाठी उत्साहवर्धक आहेत यात शंका नाही. तथापि, या यशात कॉंग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वाचे योगदान जास्त आहे असे दिसते. केंद्रीय पातळीवर पूर्णवेळ अध्यक्ष कोण असावे, राहुल गांधी यांची मनधरणी केली तरी ते निर्णय कधी घेणार, पक्षांतर्गत निवडणुका कधी घ्यायच्या याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.
पण असे असून कॉंग्रेसला राज्या-राज्यांत जर विजय मिळत असतील आणि भाजपला पराभूत करता येत असेल तर त्याच व्यूहनीतीला अधिक आशय देऊन ती व्यूहनीती राष्ट्रीय पातळीवर राबवली जाऊ शकते. पण तेथेच नेमकी उदासीनता आहे. पंजाबात कॉंग्रेसने जो पोरखेळ केला त्यामुळे तेथे कॉंग्रेसला फटका बसू शकतो; पण आपण घेतलेले निर्णय विचारपूर्वक घेतले आहेत हे सिद्ध करायचे तर पंजाब कॉंग्रेसच्या मागे शक्ती उभी करावयास हवी.
मात्र, ते चैतन्य आणि सातत्य कॉंग्रेसमध्ये दृष्टीस पडत नाही. कदाचित बॅनर्जी आणि किशोर यांचा अंगुलीनिर्देश त्याकडेच असावा. वास्तविक कॉंग्रेसच्या दोषांकडे बोट दाखवताना कॉंग्रेसच्या सहभागाशिवाय भाजप-विरोधकांच्या आघाडीला आकार आणि स्थैर्य येऊ शकत नाही हेच अप्रत्यक्षरीत्या बॅनर्जी यांनी कबूल केले आहे. आणि म्हणूनच कॉंग्रेसने आपले महत्त्व आपल्या कामगिरीतून वाढविणे आवश्यक.
खरे म्हणजे पोटनिवडणुकांच्या निकालांचा धसका घेऊन आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांची धास्ती घेऊन केंद्र सरकारने इंधन करांत लक्षणीय कपात केली आहे. पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती नेमली आहे. शेतकरी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. हे सगळे मुद्दे विरोधकांनी गेले काही महिने सातत्याने उपस्थित केले आहेत आणि भाजपने कितीही नाकारले तरी विरोधकांच्या दबावाला काहीअंशी यश येत आहे.
अशावेळी भाजपविरोधाला धार यायची तर प्रादेशिक पक्षांसह कॉंग्रेसने आपली सक्रियता वाढवणे आवश्यक आहे. हंगामी सक्रियता असूनही जर पोटनिवडणुकीत यश मिळत असेल तर त्या सक्रियतेत सातत्य आणले तर फरक पडेल हा आत्मविश्वास मुळात कॉंग्रेस नेतृत्वाच्या पातळीला हवा. तो आत्मविश्वास येण्यासाठी नेतृत्वाने सातत्याने पक्ष कार्यकर्त्यांना भेटावयास हवे; दौरे करावयास हवे. समाजमाध्यमांवरून प्रतिक्रिया देणे हा भाग आकर्षक वाटला तरी त्यास मर्यादा असतात. अखेरीस संपर्क आणि संवाद यांना राजकारणात पर्याय नाही.
प्रभावी, तरुण प्रादेशिक नेत्यांना हेरून त्यांना बळ देण्याचे काम कॉंग्रेस नेतृत्वाने करावयास हवे. अशोक गेहलोत, कर्नाटकात शिवकुमार असे नेते आपल्या पातळीवर पक्षविस्तारासाठी काम करीत आहेत. मात्र, गटबाजीचा फटका कॉंग्रेसला अनेक राज्यांत बसत आहे. त्यावर उपाय योजण्यासाठी कॉंग्रेस नेतृत्वाने स्वतः निर्णयप्रक्रियेत उडी घ्यायला हवी. कॉंग्रेस राजकारणाकडे गांभीर्याने पाहात नाही असे जेव्हा ममतादीदी म्हणतात आणि मोदींची सत्ता आपसुक लयाला जाईल अशा भ्रमात राहुल गांधी आहेत, अशी टीका प्रशांत किशोर करतात तेव्हा त्याचा अन्वयार्थ हा असतो.
कॉंग्रेसला जाहीरपणे डिवचून ममता बॅनर्जी यांनी कदाचित औचित्यभंग केलाही असेल. पण कॉंग्रेसने त्यातून योग्य संदेश घेतला आणि कॉंग्रेस प्रबळ झाली तर कदाचित ममता किंवा अन्य प्रादेशिक भाजपविरोधी पक्ष नेत्यांना तसे करण्याचे धाडसही होणार नाही. पण कामगिरी न करता कॉंग्रेसला ना भाजपला आव्हान देता येईल ना भाजपविरोधकांमध्ये मानाचे स्थान मिळविता येईल.